राज ठाकरे यांचा फोन आला म्हणून शांत बसलो… रामदास कदम यांचा गौप्यस्फोट; कुणाबद्दल बोलले?

| Updated on: Apr 19, 2024 | 5:06 PM

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनसे नेते आणि नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मला राजकारणातून संपवायला निघाला तर मी सोडेन काय? असा इशारा देतानाच राज ठाकरे यांचा फोन आल्यामुळे मी शांत बसलो, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांचा फोन आला म्हणून शांत बसलो... रामदास कदम यांचा गौप्यस्फोट; कुणाबद्दल बोलले?
ramdas kadam
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. रामदास कदम यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. वैभव खेडेकर हा महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष आहे. राज ठाकरेंचा फोन आला म्हणून मी शांत बसलो. अन्यथा अजून सात-आठ गुन्हे दाखल झाले असते, असा गौप्यस्फोटच रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. वैभव खेडेकर हा नावाला मनसेत आहे. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे अनिल परब, सदानंद कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करतो. तो जर मला संपवायला निघाला तर मी सोडेन का?, असा इशाराच रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांना दिला.

राणे नव्हे, मोदी महत्त्वाचे

कोकणात शिवसेनेला जागा मिळेल अशी अपेक्षा होती, पण हरकत नाही याची कसर आम्ही विधानसभेत भरून काढू. सध्या दुधाची तहान ताकावर भागवतोय. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला नारायण राणे नाही तर नरेंद्र मोदी महत्त्वाचे आहेत. विधानसभेत शिवसेनेचा झंझावात दिसून येईल, असा दावा रामदास कदम यांनी केला. भाजपचे स्थानिक नेते माझ्यावर टीका करत आहेत. भाजपाने माझ्या विरोधात काम केले तर त्याचे परिणाम राज्यात दिसतील, असा इशाराही कदम यांनी दिला.

त्यांना पाठिंबा द्यायचा कसा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर वैभव खेडेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन मनातील खदखद व्यक्त केली होती. आमच्यावर ज्यांनी खोट्या केसेस दाखल केल्या. त्यांना पाठिंबा का दिला? हा माझा नाही तर मनसैनिकांचा सवाल आहे, असं वैभव खेडेकर म्हणाले होते. राज ठाकरे यांना भेटून आपण आपलं म्हणणं मांडणार असल्याचंही खेडेकर यांनी म्हटलं होतं.

आदेश मान्य, पण…

ज्या लोकांनी कोकणात मनसे संपवण्याचे काम केलं, आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक केली, मनसेने निवडून आणलेल्या ग्रामपंचायती फोडल्या अश्या लोकांसोबत काम कसे करायचे ? राज ठाकरे यांचा आदेश आम्हाला मान्य आहे. पण खासदारपदाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी खेडच्या विकासकामांसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत हे सत्य आहे, असंही ते म्हणाले.