महाराष्ट्रात पावसाचे संकट अजूनही कायम, सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात पावसाचे संकट सोमवारी असणार आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. कोकणात मॉन्सून सक्रीय झाला आहे. तब्बल बारा दिवस अगोदरच मान्सून पोहचला आहे.

महाराष्ट्रात पावसाचे संकट अजूनही कायम, सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
इंदापूर तालुक्यात पडलेला पाऊस.
Image Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar | Updated on: May 26, 2025 | 7:56 AM

केरळमध्ये मान्सून दाखल होताच २४ तासांत कोकणात मान्सून पोहचला आहे. राज्यातील अनेक भागांत गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. रविवारी पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. बारामतीमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. राज्यातील पावसाचे संकट अजूनही कायम आहे. सोमवारी राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात मॉन्सून सक्रीय झाला आहे. तब्बल बारा दिवस अगोदरच मान्सून पोहचला आहे. कोकणात प्रचंड पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला आहे. भीमा आणि नीरेच्या खोऱ्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भीमा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नीरा नदीतून सध्या 30,000 क्सूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात येत असल्याने भीमा नदी काठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूर येथे भीमा नदीवर असलेला जुना ब्रिटीश कालीन पूल पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे.

मुंबईत रविवारी रात्रीपासून पाऊस सुरुच आहे. मुसळधार पावसानंतर मुंबईच्या जे.जे. उड्डाणपुलावर पाणी साचले आहे. पुढील दोन तास मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यांत सोमवारी पाऊस सुरु आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यात प्रचंड पाऊस झाला असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. इंदापूरच्या शासकीय रुग्णालयात पाणी साचले आहे.

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, बुलढाणा

विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. विदर्भात मागील पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे काढणी करून ठेवलेल्या उन्हाळी मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाने ब्रेक घेतला आहे. नाशिक, जळगावात पावसाने विश्रांती घेतली आहे. मे महिन्यात राज्यात प्रथमच प्रचंड पाऊस झाला आहे.

Follow Us