रस्त्यावर कापूस फेकला, आंदोलक झाडावर… कर्जमाफीचं आंदोलन पेटलं; विधानभवनाबाहेर तुफान राडा
रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेने महायुती सराकारच्या कर्जमाफीवर आक्षेप घेतला आहे. कर्जमाफी फसवी असल्याचं म्हणत विधानसमोर आंदोलन केलं.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंत कर्जमाफी केली. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. परंतु या कर्जमाफीवर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील क्रांतीकारी शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला. ही कर्जमाफी फसवी असल्याचे म्हणत विधानभवनाबाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर कापूस फेकत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर कापूस आणि धान्य फेकले. तर काहींनी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन केल. या आंदोलनंतर पोलिसांनी आक्रमक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी रविकांत तुपकर देखील होते. पोलिसांनी तुपकर यांच्यासहित कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला नेले.
रविकांत तुपकार म्हणाले, ‘आज आम्ही सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. आमचा गुन्हा काय आहे, तर आमच्या बापाच्या घामाचा जाब विचारत आहे. आमचं म्हणणं एकच आहे की, ही शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. या कर्जमाफीत जाचक अटी आणि निकष घातले आहेत. त्यामुळे 10 ते 15 टक्के शेतकरी कर्जमाफीत बसणार नाहीत. या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा. शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा द्या. या मागण्याची सरकार दखल घेत नाही. यासाठी मंत्री गिरीश महाजन बैठक लावतो असे म्हणाले. परंतु त्यांनी अद्याप बैठक लावलेली नाही.
‘शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. आज विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही गांधींच्या मार्गाने आलो. उद्या आम्ही भगतसिंग यांच्या मार्गाने चाल करून येऊ. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. हे सरकार क्रूर आहे .शेतकऱ्यांसाठी फासावरही जाण्याची तयारी आहे, असे तुपकर पुढे म्हणाले. दुसरीकडे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर झाडावर चढून आंदोलन केले. झाडावरून कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर या शेतकऱ्यांना खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले. कार्यकर्त्यांनी झाडावर चढून आंदोलन केल्याने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांची तारंबळ उडाली. आंदोलक झाडावर चढले. जोपर्यंत फडणवीस येऊन आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत झाडावरून उतरणार नाही, अशी आक्रमक भूमिका झाडावर चढलेल्या आंदोलकांनी घेतली आहे. तर या आंदोलकांना झाडावरून खाली आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत.