आता राजीनामा झालाच पाहिजे, व्हिडीओ व्हायरल करा, अभिजित दीपकेंच्या टार्गेटवर हे मोठं नाव; तरुणांना सांगितला प्लॅन!
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा दंड थोपाटले आहेत. एमपीएससीचे वरिष्ठ अधिकारी भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. तसेच पुढे काय करायचं? हा प्लॅन देखील सांगितला आहे.

एमपीएससी परीक्षेतील कथित घोटाळा, नवीन नंबर प्लेटमधील गैरव्यवहार आणि सीमा नाक्यांवर टोलच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर वसुली या मुद्द्यांवरून ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी राज्य सरकारविरोधात थेट आणि अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूर येथे बोलताना त्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलनाची मोठी घोषणा केली. अभिजित दिपके यांनी आपल्या भाषणात अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर आणि भ्रष्टाचारावर तीव्र आक्षेप घेतला. अभिजीत दिपके म्हणाले की, मुख्यमंत्री यांचे मित्र असलेले एमपीएससीचे अधिकारी वर आले आहेत. जर मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे लोक अशा प्रकारे भ्रष्टाचार करत असतील, तर त्यात त्यांचाही काही हिस्सा आहे का? त्यांना आमदारांना गुवाहाटीला नेण्यासाठीही पैसे लागतात, असा तिखट प्रश्नही अभिजीत दिपके यांनी विचारला.
दोन मिनिटांचा व्हिडीओ बनवा आणि…
एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजीत दिपके यांनी केली. भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत, म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला जात नाही का? असा प्रश्न अभिजीत दिपके यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर विचारला. इतकंच काय तर भिमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, या मागणीवर जोरही दिला. तसेच, भिमनवार यांच्या कथित घोटाळ्यांचा दोन मिनिटांचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
…तर मतदान नाही
अभिजीत दिपके यांनी पुढे सांगितलं की, राज्यात तब्बल 15 ते 20 लाख एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. आम्ही फडणवीस साहेबांना स्पष्ट सांगू इच्छितो की, आम्ही 20 लाख लोक आहोत, तुम्हाला आमचे मतदान नको आहे का? जर एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा मिळाला नाही, तर थेट ‘मतदान नाही’ हाच आमचा नारा असेल. हीच भाषा या सरकारला समजते, असंही अभिजीत दिपके पुढे म्हणाले.
गणपती बाप्पांचे विसर्जन झाले की लगेच आपण आंदोलनाला बसायचे
“जंतरमंतरवर जेव्हा आम्ही आंदोलनाला बसलो होतो, तेव्हा शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला लावला होता. आता एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यायचा असेल तर रस्त्यावर उतरावेच लागेल. हे सरकार सहजासहजी ऐकणार नाही,” असे सांगत दिपके यांनी आंदोलनाची पुढील रणनीती स्पष्ट केली. “गणपती बाप्पांचे विसर्जन झाले की लगेच आपण आंदोलनाला बसायचे, या मानसिकतेत तुम्ही या. आंदोलन विखुरलेले नसावे, ते एकाच ठिकाणी झाले पाहिजे. नागपूर, अमरावती किंवा संभाजीनगर यांपैकी एक ठिकाण राज्यभरातील विद्यार्थ्यांनी मिळून निश्चित करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.