अजितदादा शेवटच्या काळात प्लास्टिकच्या बाटलीतील पाणीही पित नव्हते; रोहित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत खळबळ उवडून देणारे दावे केले आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर आता अजितदादांचा विमान अपघात हा घातपात तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

अजितदादा शेवटच्या काळात प्लास्टिकच्या बाटलीतील पाणीही पित नव्हते; रोहित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट
rohit pawar and ajit pawar accident
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 10, 2026 | 6:16 PM

Rohit Pawar Press Conference : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अजितदादा यांचा फक्त अपघात नव्हे तर तो नियोजनबद्ध अपघात होता, असा रोखठोक दावा केला आहे. अजितदादा यांचा 100 टक्के घातपात झालेला असू शकतो असं खळबळजनक विधान त्यांनी केलंय. विशेष म्हणजे हे दावे करताना त्यांनी काही फोटोंचाही आधार घेतला आहे. विमान चालवण्याचे नियम, विमान लँडिंगदरम्यान असलेला प्रोटोकॉल, पायलटचा अनुभव तसेच इतर तांत्रिक बाबींचा उल्लेख करून त्यांनी अजितदादांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी थेट मागणी केली आहे. विशेष म्हणजे अजितदादांसोबत घातपात झाल्याची शंका उपस्थित करताना त्यांनी काचेची आणि प्लॅस्टिकच्या बॉटलचाही आवर्जुन उल्लेख केला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आले आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार यांनी अजितदादांसोबत घातपात झालेला असू शकतो, अशी शंका उपस्थित केली. कोणताही घातपात होऊ नये यासाठी अजित पवार किती काळजी घ्यायचे, याचे उदाहरण त्यांनी दिले आहे. अजितदादांनी शेवटच्या काळात प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे बंद केले होते, असे त्यांनी सांगितले. “अजितदादा लढवय्या होते. त्यांना कोणी ब्लॅकमेल करू शकत नव्हतं. मी फक्त ते घेत असलेली काळजी सांगितली. प्लास्टिकच्या बाटलीत टॅम्परिंग होऊ शकत होतं. त्यात काही ना काही मिसळता येऊ शकतं. म्हणून दादा प्लास्टिक बाटली ऐवजी काचेच्या बाटलीत पाणी प्यायचे. ते स्वतचे काळजी घ्यायचे,” असे रोहित पवार यांनी सांगितले.

काकांचा अपघात कसा झाला? माहीत असणं गरजेचं

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेले दावे गंभीर स्वरुपाचे आहेत. हे दावे करताना खासदार शरद पवार यांच्याशी काही चर्चा झालेली आहे का? असे त्यांना विचारण्यात आले. यावर बोलताना “रोहित पवार काही गोष्टी मांडत असेल तर त्याला अफवा म्हणत नाहीत. ज्यांना कुणाला काही वाटतं ते वाटू द्या. ते चारपाच लोक वेगळे आहेत. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमच्यासाठी काका महत्त्वाचे आहेत. आमच्या काकाचा अपघात कसा झाला, याची उत्तरे आम्हाला माहिती पाहिजेत,” असी मागणी त्यांनी केली.

तेवढी प्रगल्भता शरद पवार यांच्यात आहे

शरद पवार यांनी अजितदादांचा अपघात झाला आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही, घातपात नाही, असे विधान याआधी केले होते. त्याबाबत बोलताना, “शरद पवारांनी २८ तारखेला स्टेटमेंट दिलं. तेव्हा अपघाताच्या घटनेला सहा तास झाले असतील. मी १३ दिवसांनी बोललो आहे. सहा तासात काय माहिती मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी लाखो लोक येणार होते. त्यामुळे अर्धवट माहिती दिली तर लाखो लोक काहीही करू शकले असते. तेवढी प्रगल्भता पवार साहेबांकडे आहे,” असे उत्तर रोहित पवार यांनी दिले.