
नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणातील गंभीर आरोप आणि वाढता राजकीय दबाव पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना तातडीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत त्यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. रुपाली चाकणकरांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर आता महिला आयोगाच्या रिक्त जागी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आता यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी महिला आयोगाच्या निवडीवरून सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला आहे. त्यासोबतच त्यांनी या ट्वीटमध्ये चार अनुभवी नावंही सुचवली आहेत. केवळ राजकीय सोयीसाठी नियुक्त्या करण्यापेक्षा महिलांच्या प्रश्नांची जाण असलेल्या आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती होणे गरजेचे आहे, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..! हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा!, असे रोहित पवार म्हणाले.
१. मीरा बोरवणकर: निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी – त्यांच्या निर्भीड आणि निष्पक्ष कार्यशैलीसाठी त्या ओळखल्या जातात.
२. ॲड. वर्षा देशपांडे: सामाजिक कार्यकर्त्या – स्त्री-भ्रूणहत्या आणि महिलांच्या हक्कांसाठी त्यांचे मोठे काम आहे.
३. मनीषा गुप्ते: ‘मासूम’ संस्थेच्या माध्यमातून आरोग्य आणि महिला हक्कांसाठी कार्यरत.
४. मेधा गाडगीळ: निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी – प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव.
दरम्यान आता रोहित पवार यांनी सुचवलेल्या या नावांचा सुनेत्रा पवार किती विचार करतात की महायुतीकडून एखाद्या नवीन राजकीय चेहऱ्याला संधी दिली जाते, हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.