Sadabhau Khot: तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा आहे काय?; सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांवर बरसले

| Updated on: May 21, 2022 | 11:01 AM

Sadabhau Khot: होय, देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार. तुम्ही पुन्हा आलात की हे गडी पहिल्या डब्यात येतात. त्यामुळे आता तुम्ही पुन्हा आलात की यांना सुट्टी देऊ नका.

Sadabhau Khot: तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा आहे काय?; सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांवर बरसले
तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा आहे काय?; सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांवर बरसले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर: रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षानंतर तोंडावरचा मास्क काढला. त्यावरून खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली आहे. दोन वर्षानंतर तुम्ही मास्क काढून बोलत आहात. त्याच्या बातम्याही आल्या. तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता काय? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मी शरद पवारांना शेतकऱ्यांचे जाणते राजे मुळीच म्हणणार नाही. ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा प्रपंच मातीत घालणारे लुटारू राजे आहेत. राज्याचं सर्वात जास्त वाटोळं कुणी केलं असेल तर ते बारामतीकरांनी केलं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी उभ्या केलेल्या सहकार चळवळीचं श्राद्ध घालण्याचं काम बारामतीकरांनी केलं आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. नवाब मलिकांच्या जावयाकडे गांजा सापडला तर त्याला हर्बल तंबाखू म्हणता. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात खसखस पिकवली तर त्याला गांजा पिकवला म्हणून तुरुंगात टाकता. हा कुठला न्याय? असा सवालही त्यांनी केला.

शेतकरी घरात बसला की सगळं वाळवंट होतं. शेतात गेला की अतिवृष्टी, गारपीट होते. कोरोनाकाळात शेतकऱ्यांनी काय खाल्ले असेल याचा विचार केलाय का? पीक विमा एवढा दिला की तो अधिकारीच सापडला नाही. अतिवृष्टी आणि दुष्काळात देवेंद्र फडणवीसांनी गुंठ्याला 950 रुपये दिले आणि महाविकास आघाडीच्या पठ्ठ्याने 135 रुपये दिले. उन्हाळ्यात लिंबू 20 रुपये झाले म्हणून सरबत महागला. म्हणे मग आता कांदा 1 रुपया किलो झालाय. आता प्या ज्यूस करुन असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना वेठबिगारासारखं वापरू नका

शिवसेना नेते नेहमी म्हणतात 13 कोटी जनतेचा अपमान झाला. अरे हे काय तुमचे प्रॉडक्ट आहे का ? सगळ्यांचा अपमान व्हायला. भाजपचे कोणीही आत गेले की गुन्हा एका ठिकाणी घडतो आणि गुन्हे 12 ठिकाणी दाखल होतात. महाराष्ट्रातील पोलिसांना वेठबिगाऱ्यासारखे वापरु नका, असंही ते म्हणाले.

होय, फडणवीस पुन्हा येणार

होय, देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार. तुम्ही पुन्हा आलात की हे गडी पहिल्या डब्यात येतात. त्यामुळे आता तुम्ही पुन्हा आलात की यांना सुट्टी देऊ नका. तुमचे सरकार आल्यावर गोरगरीब तुमच्या पाठीशी आहेत, असंही ते म्हणाले.

ऊसवाल्याचे लय हाल

ऊसवाल्याचे लय हाल आहेत. 20 टन ऊस गेला की 2 टन काटा हाणत्यात. उजनीचे पाणी बारामतीला निघालंय. मला बारामतीचा अंदाज येत नाही. कारण अख्खी नीरा नदी बारामतीला नेली. आता उजनीचे पाणी नेत आहेत. आम्ही संघर्ष करत आहोत. त्यामुळे आम्हाला साथ द्या. पालकमंत्र्यांना सांगतो तुम्ही कंस मामा बनू नका. तुम्ही कंस मामा बनलात तर ही जनता देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने कृष्ण होऊन तुमचा नाश करेल. मुख्यमंत्री शेतकऱ्यांकडे बघत नाही.ही आलीबाबा चाळीस चोरांची टोळी आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावी ही जनतेची इच्छा आहे, असंही ते म्हणाले.