
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026: मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा महापालिकेची निवडणूक अधिक चुरशीची ठरली. अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढणार असे वाटत असताना ऐनवेळी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपाटले. 115 जागांसाठी महायुती, उद्धव सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम उमेदवार अनेक ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकले. पण निवडणुकीची गणितं वेगळी असतात आणि सत्तेसाठी गळ्यात गळे घालावे लागतात हे सूत्र इथं दिसू शकते. भाजपमध्येच नाही तर इतर पक्षांमध्ये बंडोबांनी शड्डू ठोकल्याने सत्तेची गणितं जुळवण्यासाठी भाजप-शिंदेसेनेला एकत्र यावे लागू शकते. तर दुसऱ्या एखाद्या पक्षाचा टेकू सुद्धा घ्यावा लागू शकतो.
मतविभागाणीचा फटका
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या एकूण 115 जागा आहेत. शहरातील जवळपास 40 प्रभागात मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. तर इतर ठिकाणी हिंदू मतदारांसह इतर समाज घटकही प्रभावी आहेत. युती केल्यास आपण मोठा भाऊ ठरणार नाही आणि सत्तेची गणित जुळणार नाही असं भाजपसह शिंदे सेनेचा व्होरा होता. इच्छुक उमेदवार आणि नाराजांची मोठी संख्या पाहता महायुतीमधील या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. पण नेमकी त्याचवेळी उद्धव सेनेने मुस्लिम कार्ड समोर आणले. रशीद मामू यांना सोबत घेत तर दुसरीकडे मध्यमवर्गात सहानुभूतीची पेरणी करत उद्धव सेनेने या दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान उभं केल्याचे दिसून आले. त्यातच भाजपच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्याने त्याची नाराजी उभ्या देशाने पाहिली. सिडको-हडकोत भाजपचे प्राबल्य आहे. पण नेमकं इथेच बंडखोरांनी त्रास दिल्याचे मानले जाते.तरु दुसरीकडे काँग्रेसचा हक्काचा मतदार यंदा उद्धव सेनेच्या बाजूने झुकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे अनेक प्रभागात उद्धव सेनेने शिंदे सेना आणि भाजपच्या उमेदवाराला टफ फाईट दिल्याचे बोलले जात आहे.
सत्ता समीकरणाचं गणित काय?
मतपेटीतून काय संदेश येतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. जर उद्धव सेनेने मोठी मुसंडी मारली अथवा काही महत्त्वाच्या प्रभाग ताब्यात घेतले तर भाजप आणि शिंदेसेनेसमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे एमआयएम आणि वंचित कुठे गणित बिघडवते याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनाला एकहाती सत्ता मिळणे शक्य नसल्याची चर्चा आहे. या दोघांनाही सत्ता स्थापनेसाठी नैसर्गिक मैत्रीचा कायम दुवा आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. तर दुसऱ्या एखाद्या पक्षाचा टेकूची पण गरज भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात घोडा आणि मैदान अगदी जवळ आहे. आज दुपारनंतर कोणी कोणाची जिरवली आणि मैत्रीचा उमाळा कुणाला येणार हे चित्र स्पष्ट होईल.