छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री आगीचा थरार, एशियन हॉस्पिटलच्या पीआयसीयूला आग, 9 चिमुकल्यांसह 55 रुग्णांची मृत्यूच्या दाढेतून सुटका
Chhatrapati Sambhajinagar Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री एक थरार घटना घडली. शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पण देव बलवत्तर म्हणून सर्वांचे प्राण वाचले आहे. मध्यरात्री काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री थरार घडला. एशियन हॉस्पिटलच्या बाल अतिदक्षता विभागाला (PICU) शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मध्यरात्री अडीच वाजता अचानक आग लागली. त्यावेळी या विभागात 9 नवजात बालकांवर उपचास सुरू होते. आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत सर्व शिशूंना सुरक्षित बाहेर काढले. तर 55 रुग्णांनाही तातडीने हलवण्यात आले. पुढील उपचारांसाठी या नवजात बालकांना घाटी रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. या बाक्या प्रसंगात सर्वांच्या समय सूचकतेने मोठा अनर्थ टळला.
सर्वच यंत्रणा तातडीने रुग्णालयासमोर हजर
मध्यरात्री आकाशवाणी चौकातील या रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने रुग्णवाहिका या रुग्णालयासमोर दाखल झाल्या. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिशूंच्या प्रकृतीचे भान राखत त्यांना काळजीपूर्वक इतर रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले. या रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, पोलीस आणि इतर यंत्रणांनी तातडीने बचाव कार्य राबवल्याने अनेकांचे प्राण वाचले. नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्व 9 शिशू सुरक्षित असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या बालकांवर वैद्यकीय पथकांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
आगीचे कारण तरी काय?
ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीत या विभागाचे नुकसान झाले, त्याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निसुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याचे आणि आगीच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. अमरावतीमधील सरकारी रुग्णालयातील आगीची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्यानंतर सर्व हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याची मागणी करण्यात येत आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कशाला आग लागली होती. त्यात तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. पहाटे साडेतीन वाजता व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली होती. ती वेगाने या कक्षात पसरली होती. घटना घडली त्यावेळी तिथे 9 बालके होती. तीन बालकांचा मृत्यू झाला होता. या हलगर्जीपणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती.