सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलं, संतोष देशमुख हत्येप्रकरणात मंत्री पंकजा मुंडे थेट बोलल्या

Pankaja Munde on Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडे विरुद्ध इतर नेते असे बीडमध्ये चित्र रंगले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा अशा पक्षांच्या नेत्यांनी धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.

सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलं, संतोष देशमुख हत्येप्रकरणात मंत्री पंकजा मुंडे थेट बोलल्या
suresh dhas pankaja munde
| Updated on: Jan 11, 2025 | 5:55 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण ढवळून निघाले आहे. सुरुवातीला मारेकर्‍यांना मोकळे रान करून देणार्‍या यंत्रणांना जनरेट्यापुढे अखेर कारवाई करावी लागली. या निर्घृण हत्येच्या एका महिन्यानंतर सात आरोपींना मोकका लावण्यात आला आहे. या हत्येनंतर मुंडे विरुद्ध इतर नेते असे बीडमध्ये चित्र रंगले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा अशा पक्षांच्या नेत्यांनी धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. तर पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर जिल्ह्याची बदनामी केल्याचा पलटवार केला आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

मंत्री पंकजा मुंडे यांनी यासर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. माझी प्रतिक्रीया काय असणार? असे म्हणत, गृह विभागाने निर्णय घेतलाय तर त्यांनी आश्वासन दिलं आहेकी कारवाई करणार आहेत, एका तरुणाची निर्घृण हत्या झाली. ज्यांना राजकारण करायचं ते करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जर म्हणत असतील की शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही. त्यावर मी काऊंटर करणार नाही. शोध लागेपर्यंत कारवाई करणार नसतील तर त्यावर मी रोज काय बोलू? असे त्या म्हणाल्या.

सुरेश धसांना घेतले फैलावर

मी महिला म्हणून खासदार राहिले, केशरकाकू, प्रितम मुंडे सगळ्या महिलांनी काम केलं. ज्या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त ऊस तोड कामगार जातात, त्याला बदनाम करण्यात आलं. गुन्हेगारी लोक असती तर दरोडे घातले असते. माझ्याकडे प्रत्येक जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे, मुळशी पॅटर्नच्या घटना आहेत. नागपूर मध्ये महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावलं असे त्या म्हणाल्या.

धस यांच्यावर काय बोलू? मी कुठं गप्प आहे. मी एसआयटीची मागणी केली होती. पहिली मागणी मी केली. माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आत जे ते बोलताय ते पूर्वी का बोलले नाही. मागच्या 2 वर्षात का बोलले नाही, असा सवाल पंकजा मुंडे यांनी सुरेश धसांना केला.