
नरकातील स्वर्ग हे संजय राऊतांचे पुस्तक येण्यापूर्वीच चर्चेत आले आहे. या पुस्तकातील दावे आण गौप्यस्फोटांनी राजकारण तापले आहे. या पुस्तकातील दाव्यांवर आता सत्ताधारी गोटातून तुफान हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजप, शिंदे गटातील अनेक नेते, मंत्र्यांनी राऊतांच्या दाव्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मंत्री संजय शिरसाट यांचे पुस्तक हे केवळ प्रसिद्धा स्टंट असल्याची टीका केली आहे. काय म्हणाले शिरसाट?
ही तर पिक्चरची स्टोरी
मी काही तरी स्फोटात्मक बोलतो आणि लिहिलो, ते सत्य माना, हे प्रकार प्रसिद्धीसाठी आहेत. नौटंकी आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर केली. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना, मग ते चित्रपट क्षेत्रातील कलाकार असो, व्यापारी, बिल्डर असो कोणी असो, राजकारणातील कोणी असेल त्याला मदत केली आणि वाच्यता केली नाही. म्हणून अनेक लोक शिवसेनाप्रमुखांवर प्रेम करतात. यांच्यामुळे शिवसेनाप्रमुख मोठे झाले नाही. त्यांच्या सावलीत हे लोकं वाढले आहेत. आमच्यासारखे लोकं मोठे झाले ते त्यांच्या आशीर्वादामुळे असे सांगत, शिरसाट यांनी राऊतांनी जे काही पुस्तक लिहिलंय ते पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखं केली आहे. स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा हा प्रकार आहे, असा घणाघात केला.
राजकारणात सर्वच गोष्टी सांगून होत नाही
राजकारणात अशा गोष्टा सांगून केल्या जात नाहीत. शिवसेना वाढायला मुंबईत कारणीभूत कोण होते. हे कधी कुणी सांगितलं नाही. शरद पवार कुणाशी बोलले. पवारांनी विरोध का केला. नरेंद्र मोदींनी कुणाला वाचवलं. या गोष्टी शरद पवार यांनी बोलल्या तर त्याला महत्त्व आहे. ज्यांनी मदत केली. ते बोलले तर त्याला आगळंवेगळं महत्त्व आहे ना. तुम्ही ही दलाली कशाला करता. तुम्हाला कुणी सांगितलं हे सर्व. तुम्ही त्यांचं ऐकून हे करत असाल तर त्यांच्या तोंडून येऊ द्या ना, असे संजय शिरसाट म्हणाले.
खऱ्या अर्थाने जे शिवसैनिक आहेत, त्यांच्या हातात शिवसेना आली आहे. लोकांनी दिलेला प्रतिसाद आणि मते ही दिसून आली. तुम्ही सहानभूतीच्या आधारावर राजकारण केलं ते लोकांनी नाकारलं. बोलायला लावू नका, शिवसेनाप्रमुखांवर तुमचं किती बेगडी प्रेम होतं, त्या शेवटच्या दिवसाला आम्ही सुद्धा तिथे होतो. मी होतो. मातोश्रीच्या आत मी होतो. म्हणून आम्हाला बोलायला लावू नका. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील. आणि त्यावेळी जे शिवसैनिक अहोरात्र शिवसेनाप्रमुखांच्या पाठी ढाली सारखे उभे होते, म्हणून त्याच शिवसेनेच्या हातात शिवसेना आली आहे, असा घणाघात त्यांनी घातला.
राऊतांसाठी राहुल गांधी मोठे
संजय राऊत काही करू शकतात. इंग्रजीत लिहील. आणि राहुल गांधी परदेशातील विद्यापीठात जातील आणि तिथे या पुस्तकाचं प्रकाशन करतील. यांना राहुल गांधी हे शिवसेना प्रमुखांपेक्षाही मोठे वाटतात. हे सत्य आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय राऊत खरं कधीच बोलणार नाही. एखाद्या दरोड्यासारखा आहे. पुढे कसा दरोडा टाकायचा ही दरोडेखोराची मानसिकता असते, तीच राऊतांची मानसिकता आहे. ही स्क्रिप्ट आहे. मनाने घडवलेली स्क्रिप्ट आहे. अमित शाह यांना शिवसेनाप्रमुखांनी मदत केली नाही हे नाकारत नाही. मदत केली आहे. पण संजय राऊत यांनी स्क्रिप्ट लिहिलीय, अशी टीका शिरसाट यांनी केली.