टिपू सुलतानचे नाव घेऊन भाजपने…; संजय राऊतांनी सर्व इतिहासच काढला

हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान विषयक विधानामुळे महाराष्ट्रात ठिणगी पडली आहे. भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच संजय राऊत यांनी भाजपच्याच नेत्यांनी भूतकाळात टिपू सुलतानाचा कसा गौरव केला होता, याचे जुने रेकॉर्ड्स समोर आणून खळबळ उडवून दिली आहे.

टिपू सुलतानचे नाव घेऊन भाजपने...; संजय राऊतांनी सर्व इतिहासच काढला
sanjay raut
| Updated on: Feb 16, 2026 | 10:30 AM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य दाखवून स्वराज्याचा विचार दिला, त्याच समकक्ष कार्य टिपू सुलतान यांनीही केले आहे. त्यामुळे त्यांना महाराजांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे, असे विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. सपकाळ यांच्या या विधानानंतर भाजपने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विधानामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असून यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध मुद्द्यावर विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी टिपू सुलतानच्या मुद्द्यावरही भाष्य केले. टिपू सुलतान विषयी भाजप आता ज्या भूमिका मांडतंय, त्यांनी इतिहासात आपण काय भूमिका घेतल्या होत्या, त्याचा रेकॉर्ड तपासावा, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला.

भाजपला कामधंदे नाही. जनतेचे, कष्टकरी लोकांचे, विद्यार्थ्यांचे, नोकरदारांचे प्रश्न यावर कधीही भाजपने आंदोलन केलेले नाही. परवा मुंबईत मेट्रोचा पूल कोसळून लोक मरण पावली हे त्यांचेच पाप आहे. ट्रम्पने देशाला गुलाम केले. त्यावर भाजपने कधी प्रश्न विचारलेत का, पण जिथे हिंदू मुसलमानांच्या संदर्भात ठिणगी टाकता येईल, असे प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांना भ्रमिष्ट करायचे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

ती नोंद भाजपलाही बदलता येणार नाही

मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानाचा फोटो लावलाय, लोकांना आक्षेप घेतल्यानंतर तो फोटो काढण्यात आला. हा विषय तिथेच संपवायला हरकत नव्हती. पण भाजपने याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन केले. या आंदोलनाची गरज नव्हती. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हे सांगायला भाजपची गरज नाही. इतिहासात काही गोष्टींची नोंद आहे आणि ती नोंद भाजपलाही बदलता येणार नाही. मुळात टिपू सुलतान विषयी भाजप आता ज्या भूमिका मांडतंय, त्यांनी इतिहासात आपण काय भूमिका घेतल्या होत्या, त्याचा रेकॉर्ड तपासावा, असेही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र बदनाम करु नका

कर्नाटकमध्ये विधानसभेत भाजपने नेमलेले रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानीचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला आहे. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले, त्यांनी टिपू सुलतान विषयी गौरवाची फुलं उधळली होती. तेव्हा तुम्ही का रोखलं नाही. अनेक महापालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावाने अनेक प्रकल्प सुरु केले. मुंबईंच्या महापौर रितू तावडे, अमित साटम यांचं याला समर्थन आहे. त्यामुळे भाजपने टिपू प्रकरणी आ बैल मुझे मार करु नये. पुढच्या दोन ते तीन वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत. कशाला उगाचच तोंडाला फेस काढताय. महाराष्ट्र बदनाम करु नका. ज्या गोष्टी इतिहासात आहेत, त्याची नोंद आहे, त्या तशाच राहतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Follow Us