इंडिया आघाडीत या… राज आणि उद्धव ठाकरेंनी हातात हात घालून देशाचं नेतृत्व करावं; संजय राऊतांचं राज यांना आवतन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवशी संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हातात हात घालून देशाचे राजकारण करावे, अशी साद राऊत यांनी घातली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच सलोखा निर्माण झाला आहे. आतापर्यंत ते अनेक मुद्द्यांवर एकत्र आले आहेत. ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक मनोमिलनानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठी इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेतच, आता त्यांनी महाराष्ट्राबाहेर पडून थेट देशाच्या राजकारणाचे नेतृत्व करावे, अशी महत्त्वपूर्ण साद संजय राऊत यांनी घातली.
राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संजय राऊत यांनी नुकतंच त्यांना एक विनंती केली आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबद्दल भाष्य केले. संजय राऊत यांनी यावेळी राजकीय समीकरणांपेक्षा मैत्रीच्या नात्याला प्राधान्य देत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आधीच एकत्र आले आहेत. राज ठाकरेंमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठे योगदान देण्याची आणि नेतृत्व करण्याची अफाट क्षमता आहे. त्यामुळे माझ्यासारख्या त्यांच्या जुन्या मित्राची हीच अपेक्षा आहे की, आता दोन्ही भावांनी मिळून देशाचे राजकारण करावे आणि देशाचे नेतृत्व करावे.
बाळासाहेबांच्या भूमिकेने देश भगवा करणार
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता हातात हात घालून पुढे यावे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली प्रखर विचारांची भूमिका त्यांनी संपूर्ण देशात अशा पद्धतीने मांडावी, जेणेकरून संपूर्ण देश पुन्हा एकदा भगव्या झेंड्याखाली एकत्र येईल,” असे संजय राऊत म्हणाले.
ठाकरे ब्रँड आता दिल्लीच्या वाटेवर?
दरम्यान महाराष्ट्रात महापालिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आधीच एकजूट पाहायला मिळाली आहे. त्यातच आता संजय राऊत यांच्या या नव्या विधानामुळे या युतीला आता राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात आधीच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. आता राऊत यांनी थेट देशाच्या राजकारणाबद्दल भाष्य केल्यामुळे ठाकरे ब्रँड राष्ट्रीय पातळीवर भाजपला शह देण्यासाठी सज्ज होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी टाकलेली ही गुगली आगामी काळातील देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.