
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. त्यातच शिवेसना ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तसेच काही खासदार संपर्कात असून लवकरच ऑपरेशन टायगर राबवू, असेही सांगितले जात आहेत. आता याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमचे ९ खासदार आहेत आणि ते शेवटपर्यंत आमच्यासोबतच ठाम राहतील,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी नुकतंच दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ऑपरेशन टायगर, ठाकरे गटाचे खासदार फुटणार याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेना जवळ येण्याच्या चर्चांवरही स्पष्टीकरण दिले. भाजपसोबतचा संघर्ष आम्ही सुरू केलेला नाही, तो त्यांनी आमच्यावर लादला आहे. २०१४ पासून हा संघर्ष सुरू आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने इराणवर युद्ध लादले आणि इराण धैर्याने लढत आहे, अगदी तशीच भूमिका आमची आहे. अमेरिकेला जशी माघार घ्यावी लागते, तशीच परिस्थिती येथेही येईल, असे संजय राऊत म्हणाले.
आमचे खासदार अजिबात फुटणार नाही. आमचे ९ खासदार आहेत. शेवटपर्यंत हे ९ खासदार राहतील. ही पुढची निवडणूक होईपर्यंत ते तसेच राहतील. महाराष्ट्रासह देशात पारदर्शक राजकारण राहिलेले नाही. पण शिवसेनेचे खासदार फुटणार, फोडणार, ऑपरेशन टायगर करणार हे करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या खुर्चीखाली सुरुंग लागलेत ते बघावेत. भाजपने ते सुरुंग लावले आहेत. त्याच्यावर तुम्ही चिंतन केले पाहिजे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
शिवेसना ही आहे त्या परिस्थितीत फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेताना दिसेल. चिंता करु नये. राजकारणात प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतोच. विशेषत शत्रू असतो तो जास्त संपर्कात असतो. जर कोणी एकमेकांना मदत केली असेल तर त्या गोष्टी समोर सांगायच्या नसतात. राजकीय वैर आणि वैयक्तिक संबंध या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रसाद लाड यांच्या घरच्या कार्यक्रमावेळीही मी हेच बोललो होतो. आम्ही विरोधकांच्या घरीही अनेकदा जातो. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार किंवा आम्ही स्वतः कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहतो, पण ते तेवढ्यापुरतेच असते. त्यावरून आमचा वैचारिक संघर्ष थांबला असे समजू नये,” असे संजय राऊत यांनी सांगितले.