Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण

"शिंदे म्हणतात मार्ग काढू, किती मार्ग काढले, किती चर्चा केल्या. ज्यूनियर मंत्री पाठवता चर्चा करता हा विषय इतका लहान आहे का?. तुम्ही गांभीर्याने या विषयावर चर्चा केली पाहिजे. जरांगे पाटील मांडत असलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. वरवर उत्तरं देता"

Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण
Sanjay Raut
| Updated on: Aug 31, 2026 | 10:59 AM

“मनोज जरांगे पाटील त्यांच्या समाजाचं नेतृत्व करत आहेत. प्राण पणाला लावून लढतायत. सतत उपोषणाने त्यांची प्रकृती खालावली आहे. मध्यंतरी मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना सांगितलं सारखी, सारखी उपोषण करु नका. त्यांना सांगितलं प्रकृतीची वाट लावून घेऊ नका. अशावेळी मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत, वातावरण तापलेलं असताना परभणीचे खासदार त्यांनी मेळावा घेतला. डेप्युटी सीएमला बोलावलं, तो टाळावा अशी जरांगे पाटील यांची भूमिका होती. त्यांची ती तळमळ, तडफड मी सुद्धा पाहिली” असं संजय राऊत म्हणाले. परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांनी काल शेतकरी मेळावा घेतला. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं होतं. हा मेळाला रद्द करा असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. पण बंडू जाधव यांनी मेळावा घेतला. त्यावर संजय राऊत बोलत होते.

“खासदार संजय बंडू जाधव यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळी जरांगे पाटलांची फार मोठी मदत झाली, हे सत्य आहे. त्यांनी जर ती अपेक्षा केली असेल, तर त्यांनी तो त्याग करायला पाहजे होता. पण बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष ठाकरेंकडे सत्ता भोगल्यानंतर ठाकरेंचे होऊ शकले नाहीत, सर्व पदं भोगली. ते आता आमच्या मनोजदादा जरांगेंचे कसे होतील? ते नवनवीन आई-बाप शोधत असतात. आता त्यांच्या मध्ये काय होतय ते पाहू, हा त्यांचा अंतर्गत लढा आहे. मी वारंवार सांगतोय उपोषणाचा विषय नेत्याच्या प्रकृतीला त्रासदायक असतो हे जंतरमंतरने पाहिलय” असं राऊत म्हणाले.

ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत

“त्या खासदारांची सर्वात मोठी चूक, अपराध कोणता असेल तर त्यांनी ठाकरेंशी गद्दारी केली. जो माणूस ठाकरेंचा होऊ शकत नाही, त्यांच्याकडून जरांगे पाटलांनी काय अपेक्षा करावी. त्यांनी धडा शिकवण्याची भूमिका घेतली आहे. मला त्यांचा स्वभाव माहित आहे. ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. हे जे गद्दार गेलेत ते परत संसदेत जाणार नाहीत याची व्यवस्था शिवसैनिकांनी केली आहे” असं संजय राऊत म्हणाले.

ते नागपूरात बसून स्टेटमेंट देतात

“जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे की, त्यांच्या समाजाची फसवणूक होत आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री कुंपणावर बसून आहेत. ते नागपूरात बसून स्टेटमेंट देतात. चर्चा करुन मार्ग काढू. आतापर्यंत कोणत्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढलाय ते त्यांनी सांगावं” असं राऊत म्हणाले.

 

Follow Us