Sanjay Raut : तू किती फोडले, मी किती फोडले या पलीकडे.. शिंदे-मोदी भेटीवरून राऊतांनी फटकारलं
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे. . पंतप्रधानांना संसदेऐवजी फुटीर खासदारांसाठी वेळ असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीसाठी दिल्लीत आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरून सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू असून शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच असल्याचं त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी ठामपणे मांडलं. मात्र या जोरदार युक्तीवादामुळे शिवसना शिंदे गटाच्या गोटात अस्वस्थता पसरली असून एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा याच पार्श्वभूमीवर होत असल्याची चर्चा आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचेने ते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी-शिंदे भेटीवरून जोरदार टीकास्त्र सोडलं. पंतप्रधानांना संसदेत यायला वेळ नाही, मात्र फुटीर खासदारांबरोबर गुलछबूगिरी करायला वेळ आहे. मोदी आणि शिंदे यांच्यात काय चर्चा होणार ? तू किती फोडले, मी किती फोडले या पलीकडे त्यांच्यात काही आयक्यू (बुध्यांक) आहे असं मला वाटत नाही ! अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
काय म्हणाले राऊत ?
बेईमानी केलेल्या आणि घटना आणि कायद्याचा भंग करून पक्षांतर केलेल्या खासदारांबरोबर पंतप्रधान ब्रेकफास्ट करतात, ही आपल्या पंतप्रधानांची लायकी ! देशाच्या पंतप्रधानाने अशा प्रकारे फुटीरतेला प्रतिष्ठा देऊ नये, असं राऊतांनी सुनावलं. पंतप्रधानांना संसदेत यायला वेळ नाही, मात्र 50 कोटीला जी माणसं विकत घेतली, त्या फुटीर खासदारांबरोबर गुलछबूगिरी करायला वेळ आहे. या देशाच्या नेतृत्वाचं झालेलं हे अधःपतन आहे. तू किती फोडले, मी किती फोडले आणि अजून किती फोडले यापलीकडे काही नाही. महाराष्ट्रात अदानीला आणखी किती प्रॉपर्टी द्यायच्यात, अजून काही विकता येईल का,आता काही शिल्लक आहे का विकण्यासाठी यावरच दोघांमध्ये चर्चा होईल, अशी टीका राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार हे एखाद्या पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून ते बाहेर तर आले नाहीत ना ! ते उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत. पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला आहे. निवडणूक आयोगानं दबावाखाली शेण खाल्लं, असा आरोप राऊतांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्यात हिंमत असेल तर..
शिवसेना कोणाची याचा निर्णय जनतेच्या न्यायालयात आधीच झाला आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. गेल्या वेळी आम्ही 40 होता, आता 60 आमदरा निवडणुकीत निवडून आले, असंही ते म्हणाले. त्यावरून राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ‘नारायण राणे यांनी पक्ष सोडला पण त्यांनी कधी पक्षावर दावा केला नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. तो पक्ष चालला नाही. ते काँग्रेसमध्ये गेले. ते भाजपात गेले. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली. एकनाथ शिंदेंमध्ये जर हिम्मत होती आणि जर ते स्वतःला नेते समजतात तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढायला हवा होता. मग त्यांना कळलं असतं जनतेचा दरबार काय आहे आणि दरबारात कोण मोठं असतं’, असं राऊतांनी सुनावलं.
स्वतःचा पक्ष काढा,स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढा. बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची अमित शहांच्या मदतीने चोरी करून, निवडणूक आयोगाच्या मदतीने चोरी करून त्याच्यावर निवडणुका लढायच्या. ही मतं शिवसेनेची आहेत, यावर शिंदेंचा हक्क नाही. शिंदेंसाठी उत्तम निशाणी म्हणजे चमचा आहे, असं टीकास्त्र राऊतांनी सोडलं.