‘मला दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी ताटकळत ठेवलं नाही’, उदयनराजे भोसले यांच्याकडून अखेर स्पष्टीकरण

| Updated on: Mar 27, 2024 | 5:42 PM

खासदार उदयनराजे भोसले आज दिल्लीतून साताऱ्यात परतले आहेत. उदयनराजे दिल्लीतून पक्षश्रेष्ठींकडून आपल्या लोकसभा उमेदवारीचं तिकीट पक्क करुनच परतले आहेत. सातारा लोकसभेचं तिकीट आपल्यालाच मिळेल, अशी उदयनराजे यांना खात्री आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून आज उदयनराजेंचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी उदयनराजेंना अमित शाह यांच्या भेटीसाठी तीन दिवस ताटकळत का राहावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर उदयनराजे यांनी स्वत: दिलं.

मला दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी ताटकळत ठेवलं नाही, उदयनराजे भोसले यांच्याकडून अखेर स्पष्टीकरण
खासदार उदयनराजे भोसले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावा केला जात होता. त्यामुळे उदयनराजे भोसले हे भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. उदयनराजे यांना दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायची होती. त्यासाठी त्यांना तीन दिवस ताटकळत राहावं लागलं, अशी चर्चा सुरु होती. अखेर या चर्चांवर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिलीय. उदयनराजे भोसले यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक ठरली. त्यांना साताऱ्यातून लोकसभेच्या जागेवर उमेदवारी मिळाल्याचं जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे उदयनराजे आज दिल्लीहून साताऱ्यात आले तेव्हा त्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केलं.

“माझे याअगोदरही दिल्लीत दौरे चालूच होते. मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं. नेहमी बातम्या येत होत्या की, ताटकळत ठेवलं. पण असं काही नाही. आज केवळ आपल्या सातारा आणि महाराष्ट्राची निवडणूक नाही. संपूर्ण देशभरात निवडणूक सुरु आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील प्रत्येक टप्पातील निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये तेढ निर्माण झाले होते. महायुतीत तेढ निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम आता झालेलं आहे”, असं उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं.

पक्षश्रेष्ठींनी उदयनराजेंना काय शब्द दिला?

पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला काय शब्द दिला? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उदयनराजेंनी भूमिका मांडली. “पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचं ते सांगितलं आहे. पक्षश्रेष्ठी म्हणजे माझे मित्रमंडळी आणि सहकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या इतर पक्षांच्या सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे त्याबाबत शंका घ्यायचं काही कारण नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

‘कुणालाही इशारा नाही’

“एक लक्षात घ्या, कार्यकर्त्यांकडून आज जे जंगी स्वागत होतोय, हा इशारा कुणालाही नाहीय. उमेदवारांची यादी कदाचित आज जाहीर होईल. ती एक प्रक्रिया आहे. यादी जाहीर होईल. सगळं निश्चित झालेलं आहे. निवडणूक मी लढवणारच आहे. कधीतरी सातारला यायचंच होतं. आज मुहूर्त निघाला. आज आलो”, असंही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केलं.

“साताऱ्यात माझ्या स्वागतासाठी इतके लोकं इथे आले आहेत हे बघून खरोखर काय बोलावं ते मला सूचत नाहीय. मी कालही जनतेचा होता, आजही आहे, भविष्य काळात जे जे म्हणून माझ्याकडून लोकांच्या हिताचे कामे असतील ते सोडण्याचं काम मी निश्चितपणे करणार. जनतेचे आभार जेवढे मानावे तेवढे कमीच आहेत”, अशी भावना उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.