सातारा जिल्हा-सत्र न्यायालयाचे ‘ते’ न्यायाधीश मोठ्या अडचणीत, त्यांचा जामीनही फेटाळला

लाच प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या अटकपूर्व जामीनासाठी आज सातारा न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती निकम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

सातारा जिल्हा-सत्र न्यायालयाचे ते न्यायाधीश मोठ्या अडचणीत, त्यांचा जामीनही फेटाळला
प्रातिनिधिक फोटो
Chetan Patil | Updated on: Dec 13, 2024 | 8:42 PM

सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 4 जणांविरोधात 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्या वतीने सातारा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हा न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. असं असलं तरीही उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना अटक होऊ शकत नसल्यामुळे अद्याप या प्रकरणात न्यायमूर्ती यांना अटक करण्यात आलेली नाही.

नेमके प्रकरण काय?

या प्रकरणात तक्रारदार युवतीचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना जामीन मंजूर करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्या माध्यमातून त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मागितली होती. यानंतर संबंधित युवतीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. यानंतर पुणे लाचलुचपत विभागाने न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सापळा रचून ही कारवाई केली होती.

न्याय कुणाकडे मागायचा?

संबंधित प्रकरण हे अतिशय धक्कादायक आहे. सर्वसामान्य जनता ही न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाते. पण तिथे न्यायाधीशच अशाप्रकारे वागत असतील तर मग न्यायाची अपेक्षा कुणाकडे करायची? असा प्रश्न उपस्थित होतोय. संबंधित न्यायाधीशांवरील आरोप अद्याप पूर्णपणे सिद्ध व्हायचे असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत काही जण सापडले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे न्यायाधीशांकडे आपण खूप अपेक्षाने पाहत असतो. या महाराष्ट्राला आणि देशाला चांगल्या न्यायमूर्तींची परंपरा लाभली आहे. देशाचा इतिहासही अभिमानास्पद राहिला आहे. पण याचा विसर संबंधित न्यायाधीशांना झाला असेल का? किंवा अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्या आरोपींना आपण काय करतोय? याचं भान का नसावं? असादेखील प्रश्न उपस्थित होतोय. तसेच न्यायाधीशच अशाप्रकारे वागायला लागले तर सर्वसामान्य जनतेने न्यायासाठी नेमकं कुणाकडे जावं? हा देखील आता महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. याप्रकरणी आता काय-काय कारवाई होते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Follow Us