ठाकरेंना मोठा दणका! नेत्याने एबी फॉर्म घेऊन भरलाच नाही? मोठी खळबळ; अनागोंदी चव्हाट्यार
नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेत खळबळ माजली असल्याचे कळत आहे. नाशिकचे नेते अनिल कदम यांनी मातोश्रीशी चर्चा करुनही फॉर्म भरला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात सध्या आगामी विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या प्रक्रियेत एकूण सतरा जागांसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजपासून या सर्व अर्जांची अधिकृत छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेत हंगामा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेत खळबळ माजली असल्याचे कळत आहे. नाशिकच्या बड्या नेत्यांनी चर्चा करुन, एबी फॉर्म देऊनही भरला नसल्यामुळे ठाकरे गटात मोठा हंगामा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकमधील काही प्रमुख नेत्यांच्या अनपेक्षित वागणुकीमुळे ठाकरे गटात मोठा हंगामा झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे थेट ‘मातोश्री’ला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामध्ये प्रामुख्याने नाशिकचे नेते अनिल कदम आणि वसंत गीते यांच्या नावांची चर्चा आहे.
दोन बड्या नेत्यांमुळे खळबळ
अनिल कदम यांनी उमेदवारीसंदर्भात थेट ‘मातोश्री’वर पक्षश्रेष्ठींसोबत सविस्तर चर्चा केली होती. मात्र, ही चर्चा होऊनही आणि वरिष्ठांचा निरोप असूनही त्यांनी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरलाच नाही. दुसरीकडे, वसंत गीते यांनी उमेदवारीचा फॉर्म हाती घेतला होता, परंतु त्यांनीही तो भरून दाखल करण्याकडे पाठ फिरवली. ऐन वेळी या दोन्ही प्रमुख नेत्यांनी अशी माघार का घेतली किंवा फॉर्म का भरला नाही, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही.
वरिष्ठांशी चर्चा करूनही फॉर्म न भरणे आणि फॉर्म हातात घेऊनही तो दाखल न करणे, या नाशिकच्या नेत्यांच्या कृतीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी अस्वस्थता आणि खळबळ निर्माण झाली आहे. ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे पक्षांतर्गत राजकारणात नेमकं काय शिजतंय आणि या नेत्यांच्या मनात काय चाललंय, यावर आता राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.