‘विलीनीकरणाचा मुद्दा संपला’, प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर शरद पवारांनी हात जोडले, बोलणं टाळलं!

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा चालू झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी मात्र विलीनीकरण होणार नाही, असेच संकेत दिले आहेत.

विलीनीकरणाचा मुद्दा संपला, प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर शरद पवारांनी हात जोडले, बोलणं टाळलं!
praful patel and sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 03, 2026 | 7:14 PM

Sharad Pawar : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही देण्यात आले आहे. दुसरीकडे अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. खासदार शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून अजितदादा आणि शरद पवार यांच्यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाली होती. 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरण होणार होते, अस सांगितले जात आहे. असे असतानाचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या एकत्रीकरणाचा दावा फेटाळून लावला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या याच भूमिकेवर आता शरद पवार यांनी बोलणं टाळलं आहे.

शरद पवार यांनी हात जोडले

प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाचा मुद्दा सपलेला आहे. अजितदादा असे बोललेच नव्हते, असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यांच्या याच दाव्याबाबत शरद पवार यांना विचारण्याचा प्रयत्न माध्यम प्रतिनिधींनी केला. परंतु शरद पवार यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या विलीनीकरणाच्या विधानाबाबत प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी हात जोडल्याचे पाहायला मिळाले.

प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?

प्रफुल्ल पटेल यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना मी आमच्या पक्षाबद्दलच बोलणार आहे. मी कोणत्याही काल्पनिक गोष्टीवर बोलणार नाही. माझ्या परीने एवढंच सांगतो की, मी आमच्या पक्षात अजितदादांनंतर पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो. माझी भूमिका अजितदादांच्या सुसंगत राहिली. तेव्हाच २०२३ रोजी आम्ही निर्णय केला. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. सर्व आमदार अजितदादांसोबत राहिले. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी चालली. आमच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे., असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. तसेच अजित पवार यांनी याआधी अनेक मुलाखती दिलेल्या आहेत. विलीनीकरणाबाबत त्यांची माझ्यासोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. विलीनीकरणावर चर्चा झाली असती तर त्याबाबत आम्हाला माहिती नाही, असं होऊच शकत नाही. मी अजितदादांच्या दोन मुलाखती पाहिल्या आहेत. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमच्यासमोर विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. फक्त स्थानिक स्वराज्यसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती होती, असेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.