मोदींना तो सल्ला दिला अन्… शरद पवार आणि मोदी भेटीत काय घडलं? पवारांनी सांगितली आतली बातमी
Sharad Pawar and PM Modi : काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. यात काय चर्चा झाली ती माहिती आता समोर आली आहे.

गेल्या एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आले आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता राष्ट्र्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बोललो होतो असं पवार यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी या दोन नेत्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. आता शरद पवार यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत भेटीत झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे.
मी पंतप्रधानांना विनंती केली…
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, ‘पेपरफुटीने अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. आनंद हा आहे की संयमाने आणि शांततेने युवा पिढीने आपल्या भावना देशाच्या नेतृत्वासमोर मांडल्या. त्यांना यश आलं. आज चर्चेच्या दोन तीन राऊंड झाल्या होत्या. मी स्वत पंतप्रधानांना भेटलो, त्यांना विनंती केली, लोकशाहीत संवाद ठेवण्याची आवश्यकता असते. संवाद न ठेवल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्ही हा डायलॉग सुरू ठेवला पाहिजे. एक तर राजीनामा घ्या किंवा संवाद सुरू करून त्यांचं ऐका.’
दोघांमध्ये हे बोलणं झालं…
शरद पवार यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘मी पंतप्रधानांना म्हटलो तुम्ही तुमच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक दोन कलिग शक्यतो सीनियर यांना अभिजीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी बोललं पाहिजे. सरकार संवाद साधायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका, असं अभिजीतला सांगितलं होतं. सुदैवाने त्यांची बोलण्याची तयारी होती. मोदींसोबत माझं हे बोलणं झालं. त्याचा परिणाम मला दिसला. त्यांनी केंद्रातील वरिष्ठ सहकारी नियुक्त केले. चर्चेच्या दोन राऊंड झाल्या. केंद्राने मान्य करावं असा जो आग्रह करावा अशा गोष्टी होत्या त्या मान्य झाल्या नव्हत्या.’
मी युवा पिढीचं अभिनंदन करतो…
पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, ‘दुसऱ्या राऊंडला केंद्र सरकारने विचार करण्याची भूमिका घेतली आणि तरीही युवा पिढीचा आग्रह शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा होता, तो आग्रह शिक्षण मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी स्वीकारला. मी युवा पिढीचं अभिनंदन करतो. जे काही घडलं त्यापेक्षा आणखी निर्णय योग्य झाला. पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठी हल्ला, अश्रूधूर हे प्रकार टाळले असते तर अधिक चांगलं दिसलं असतं.’