Supriya Sule : शरद पवार महायुतीसोबत जाणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, तावडेंना 21 वेळा भेटले… नेहमीच भेटते…
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. विनोद तावडे यांच्यासोबत 21 वेळा भेटल्याचे सांगत त्यांनी या भेटींचा राजकीय संबंध फेटाळला.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी मागच्या काळात जोर धरला होता. काँग्रेसच्या नेत्यांनीही या चर्चांना दुजोरा दिला होता. आता या चर्चा थांबलेल्या असतानाच नव्या चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी महायुतीत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच शरद पवार महाविकास आघाडीतून फुटणार असल्याचं बोललं जात आहे. पवार गटाच्या नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत चर्चाही झाल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी हा प्रश्न खुमासदारपणे टोलवून लावला. यावेळी त्यांनी मिश्किल विधानही केलं.
खासदार सुप्रिया सुळे मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी शरद पवार गट महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात त्या संदर्भात चर्चाही झाली आहे, असं विचारण्यात आलं. त्यावर, बैठक झाली की नाही मला माहीत नाही. विनोद तावडे आणि आम्ही अनेक वेळा भेटलो आहे. आम्ही एका कमिटीत आहोत. गेल्या महिन्याभरात मी आणि विनोदजी 21 वेळा भेटलो यात भाजपचे अनेक नेते होते. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष देखील त्यात असतो. असे अनेक नेते आमच्याबरोबर एकत्र असतात, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं.
देव जाणे…
राष्ट्रवादी सत्तेत दिसेल का? असं विचारताच, आमची भूमिका सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्याची आहे. गेले 12 वर्षे आमच्याबद्दल सातत्याने बोललं जात आहे. भविष्यात असाच जर कारभार झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आम्हाला लढावच लागेल आणि सत्ता घ्यावीच लागेल. देव जाणे पुढे हे काय करतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काय बोलणार?
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या लुटीवरूनही त्यांनी हल्ला चढवला. पैसे चांदी काढताना मंदिरातून हे व्हिडिओ समोर आले. तुमच्या चॅनलने ते दाखवले. पूर्ण भारतीय जनतेने कष्टातून संघर्ष करून हे मंदिर बांधलं. ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत. त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल तर यावर आपण काय बोलणार? ज्यांनी आपल्यावर संस्कार केले ते काँग्रेस राष्ट्रवादी भ्रष्टाचारी आहे असं भाजप म्हणते. आज त्यांना उत्तर द्यावा लागेल की तुम्ही प्रभू श्रीरामाला सुद्धा सोडलं नाही. फसवी कर्जमाफी केली आणि प्रभू श्रीरामाला फसवण्याचे पाप जे केलं त्याचं उत्तर त्यांना द्यावा लागेल, असा हल्लाच त्यांनी चढवला.
फसवी कर्जमाफी
यावेळी त्यांनी शेतकऱी कर्जमाफीवरून सरकारवर टीका केली. ही फसवी कर्जमाफी आहे. मातीशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याचे पाप या सरकारकडून होत आहे, असा हल्ला त्यांनी केला. तसेच मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यावरूनही त्यांनी सरकारला घेरलं. मी कालच मागणी केली आहे, मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी लावली पाहिजे. मिसिंग लिंकचा एवढा मोठा गाजावाजा करून पहिल्याच पावसात एवढी मोठी घटना झाली. 18 तास मिसिंग लिंक बंद होती. ठेकेदारांना उत्तर द्याव लागेल, असं त्यांनी म्हटलंय.