अजितदादांचा घातपात की अपघात, त्या दिवशी जे काय घडलं ते शरद पवारांनी पहिल्यांदाच सगळं सांगितलं, सर्वात मोठी बातमी
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर बोलताना आता शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांचं विमान मुंबईहून बारामतीकडे येण्यासाठी निघालं होतं. मात्र बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरत असतानाच हा अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तर अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ते दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
रोहित पवार यांच्याकडून अजित पवारांच्या अपघाताबाबत घातपाताचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात शरद पवार यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, त्यांनी अभ्यास केला, त्यांचं मत काय आहे? आणखी काही लोकांची काय मतं आहे. पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. हा जो प्रकार घडला, अपघात झाला त्या दिवशी अजित पवार आठ साडेआठ वाजता एअर पोर्टावर पोहोचले. लँडिंग होत असताना त्यांचं विमान धवपट्टीपासून बाजूला गेलं, त्यात हा अपघात झाला. अपघातानंतर मी मुंबईवरून हेलिकॉप्टरने बारामतीला निघालो. हेलिकॉप्टरमध्ये मला अपघाताची माहिती कळली. त्यावेळी बारामतीला लँड झालो, सर्व स्थिती पाहिली. हा अपघात असावा असं मला प्राथिमकदृष्ट्या वाटलं. पण रोहित आणि त्यांच्या लोकांनी अभ्यास केल्यानंतर त्यांची वेगळी मतं होती, पण त्याबाबतची माहिती माझ्याकडे नाही, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी अशोख खरात प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही मला कधीपासून ओळखता. माझ्या हातात तुम्हाला कधी गंडा दिसला? कुठे काही दिसलं. मी दोन तीन ठिकाणी जातो. पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर तुळजा भवानीचं दर्शन घेतो. महत्त्वाचं काही असेल, निवडणूक असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे, माझं गाव आहे. तिथल्या महादेवाच्या मंदिरात जातो. दोन चार वर्षातून एकदा. जे करतो त्याची जाहिरात करत नाही. आज महाराष्ट्रात चिंता वाटावी असं चित्र आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.