
सध्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जादूटोणा, तंत्र-मंत्र आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याचे समोर येत आहे. अनेक बडे राजकारणी आणि मंत्री या भोंदूबाबाच्या दरबारी हजेरी लावत असल्याचे फोटो आणि माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राची प्रतिमा पुरोगामी आणि विज्ञानवादी आहे, मात्र सत्ताधारीच अशा बुवाबाजीला खतपाणी घालत असतील, तर त्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांनाही सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्र हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच एक पुरोगामी, सुधारणावादी आणि विज्ञानवादी राज्य राहिले आहे. अशा राज्यात जर भोंदूगिरी आणि बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात सत्ताधारी सहभागी होत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशोक खरातच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना आणि मंत्र्यांना या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे. त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातील भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
हे आता सांगतात की अशोक खरात काय प्रकरण होतं हे आम्हाला माहिती नव्हतं, ते पूर्णपणे चुकीचं आहे. याप्रकरणी त्यांच्यावरील पहिला गुन्हा २००३ मध्ये दाखल झाला. २००५ मध्येही गुन्हा नोंद आहे. त्यानंतर एका वृत्तपत्रात खरातच्या करारनाम्याबद्दल एक लेखमाला प्रसिद्ध झाली. तेव्हा त्या पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. पण तरीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे जात असतील, त्यांच्या पायावर डोकं ठेवत असतील, तंत्र-मंत्र जादूटोणा करत असतील तर या सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे. त्यांना कोण वाचवतंय हे तपासात समजेल, असेही संजय राऊतांनी म्हटले.
नाशिक प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पकडलाय. आता त्याच्या चौकशीत जी काही नाव समोर येतील, ती नाव दडपली जाणार नाहीत. माझा नाशिकच्या पोलीस आयुक्तांवर विश्वास आहे. दीपक केसरकरांवर कोणीही विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.