धर्म बदललास तर तुझे वडील… नाशिकच्या आयटी कंपनीतील अजून एक धक्कादायक प्रकार उघड

नाशिकमधील टीसीएस बीपीओमध्ये धर्मांतरासाठी कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेने दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

धर्म बदललास तर तुझे वडील... नाशिकच्या आयटी कंपनीतील अजून एक धक्कादायक प्रकार उघड
Nashik IT Company
| Updated on: Apr 17, 2026 | 11:08 AM

नाशिकमधील टिसीएस या नामांकित आयटी कंपनीत सुरू असलेल्या कथित धर्मांतर आणि कर्मचाऱ्यांच्या छळाच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता एका पीडित कर्मचाऱ्याने आपले अनुभव मांडत धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी तिने तौसीफ अत्तार आणि दानिश शेख हे आपल्या पदाचा गैरवापर करून टीम लीडर्सकडून कशा प्रकारे धर्मांतरासाठी दबाव आणला जात होता आणि महिलांचा अपमान केला जात होता, याबद्दलची माहिती दिली आहे.

पीडितेने काय सांगितलं?

मी २०२२ मध्ये कामाला लागले. त्यानंतर तौसिफ अत्तार आणि दानिश शेख यांसारख्या टीम लीडर्सचा त्यांना सामना करावा लागला. तौसीफ अत्तार टीम लीडर असल्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करणे भाग होते. याचा फायदा घेत, हे लोक स्वतःचे कामही माझ्यावर सोपवून मला मानसिक त्रास द्यायचे. रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर मला मांसाहारी जेवण खाण्याची सक्ती केली जायची. जर ते खाण्यास नकार दिला तर मुद्दाम धार्मिक श्रद्धांचा अपमान केला जायचा, असे पीडितेने सांगितले.

धर्मांतर करा, वडील बरे होतील

माझ्या वडिलांना मार्च २०२३ मध्ये पॅरिलिसिसचा झटका आला होता. या संवेदनशील परिस्थितीत, तौसीफ, दानिश आणि त्यांच्या साथीदारांनी मला धर्मांतर करण्याचा सल्ला दिला. तुमच्या धर्मात त्रुटी आहेत, तुम्ही धर्मांतर केले तर तुमचे वडील बरे होतील, असे खोटे आश्वासन तिला देण्यात आले. इतकेच नाही तर एका दुसऱ्या सहकाऱ्याची पत्नीला गर्भधारणा होत नसल्याचे समजल्यावर, त्याला अतिशय आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरची टिप्पणी ऐकवण्यात आली. या वादातून तौसीफने मला टेबल फॅन फेकून मारला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनाही या टोळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. आरोपी महिला सहकाऱ्यांबद्दल अत्यंत खालच्या भाषेत आणि अपमानजनक टिप्पण्या करत असत, असेही पीडितेने नमूद केले आहे. कार्यालयातील वातावरण दूषित करून सर्वांवर धर्मांतरासाठी दबाव टाकणे हाच या लोकांचा मुख्य उद्देश असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची उकल फेब्रुवारी २०२६ मध्ये झाली. कंपनीत काम करणाऱ्या एका हिंदू महिलेने रमजानच्या काळात उपवास केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे तपास करत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना हाऊसकीपिंग कर्मचारी म्हणून कंपनीत तैनात केले. या कारवाईनंतर धक्कादायक पुरावे हाती लागले. या प्रकरणी आतापर्यंत सात पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली असून, निदा खान नावाची एक आरोपी अद्याप फरार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Follow Us