चिन्मयला नाशिककर असल्याचा अभिमान, सिद्धार्थच्या केसावर फुगे; अन् पूजाच्या खांद्यावर गोड ओझे…!

| Updated on: Mar 06, 2022 | 10:53 AM

सिद्धार्थ जाधवने आपल्या भाषणात आपण दिसायला फार चांगले नाही, असा उल्लेख केला. हा धागा पकडत जयंत पाटील म्हणाले की, आपण दिसायला चांगले नाहीत, असे कोण म्हणतो. आपण जी हेअर स्टाईल केली आहे, तिचे मला फार आकर्षण वाटते, असे सांगत आपल्या केसावर जो फुगा आला आहे, त्याला मला हात लावावा वाटतो, असे म्हणताच सिद्धार्थनेही आपल्या जागेवर उठून पाटील यांच्याकडे धाव घेतली. अन्...

चिन्मयला नाशिककर असल्याचा अभिमान, सिद्धार्थच्या केसावर फुगे; अन् पूजाच्या खांद्यावर गोड ओझे...!
नाशिकमध्ये अभिनेता चिन्मय उदगीरकर, सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री पूजा सावंतचा गौरव करण्यात आला.
Follow us on

नाशिकः सुविचार गौरव पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) केसाच्या फुग्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले. इतकेच नाही, तर त्याच्या झुपकेदार केसांवरून हात फिरवला, तेव्हा सभागृहात हास्याच्या उकळ्या फुटल्या. सिद्धार्थने आपण एकलव्यासारखे काम केल्याने यश मिळाल्याचे सांगितले. चिन्मय उदगीकरने (ChinmayUdgirkar) आपण नाशिककर असल्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला, तर पूजा सावंतला (Pooja Sawant) या पुरस्कारामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढल्याचे वाटले. या कलावंतांनी हा सोहळा गाजवलाच. दुसरीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत तुफान टोलेबाजी केली. त्यांनी दूरसंचार क्षेत्र आणि पोलीस आयुक्तांवर अशा कोट्या केल्या की, उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला आणि सोहळा देखणा झाला.

‘बीएसएनएल’ वाचवा…

भुजबळ म्हणाले, नाशिकच्या नितीन महाजन यांनी दूरसंचार नाशिकला देशात एक नंबरवर आणले आहे. मात्र केंद्र सरकारने रेल्वे, विमान कंपनीचे खासगीकरण केले. त्यामुळे ते दूरसंचारही केव्हा विकतील, याचा नेम नाही. शेवटी ही दिल्लीकरांची कृपादृष्टी असल्याशिवाय शक्य नाही, ही भावना तिथपर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी केले. तर दररोज गोदावरीत स्नान करणाऱ्या पोलीस आयुक्तांनी गोदा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हातभार लावावा अन् रामकुंडात डुबकी मारावी, असा टोलाही त्यांनी हाणला.

देव द्या, देवपण घ्या…

भुजबळ म्हणाले की, अविचार न करता सुविचार करा, असा संदेश देत ‘सुविचार मंच’ नाशिक ही सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारी संस्था असून, लोकमनाच्या सुखदु:खात सहभागी होऊन त्यांना भावनिक आधार देण्याचे काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी काम करत असून, आकाश पगार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी युवक गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी ‘देव द्या देवपण घ्या’ हा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम राबवीत आहेत. ही बाब अतिशय गौरवाची असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणतात केसावर फुगे…

जलसंपदामंत्री जयंत पाटील हे भाषणासाठी उभे राहिले. भाषणाला सुरुवात करताना त्यांनी अभिनेता सिद्धार्थ जाधव याचे कौतुक केले. सिद्धार्थने आपल्या भाषणात आपण दिसायला फार चांगले नाही, असा उल्लेख केला होता. हा धागा पकडत पाटील म्हणाले, आपण दिसायला चांगले नाहीत, असे कोण म्हणतो. आपण जी हेअर स्टाईल केली आहे, तिचे मला फार आकर्षण वाटते, असे सांगत आपल्या केसावर जो फुगा आला आहे, त्याला मला हात लावावा वाटतो, असे म्हणताच सिद्धार्थनेही आपल्या जागेवर उठून पाटील यांच्याकडे धाव घेतली. यावेळी पाटील यांनी सिद्धार्थच्या केसावरील फुग्याला हात लावताच सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी सुविचार मंचचे कौतुक केले. अतिशय कल्पकतेने आकाश पगार यांनी हा सोहळा आयोजित केला. ही कौतुकास्पद बाब असून इतक्या मान्यवरांवर एका व्यासपीठावर आणले हे सुविचार मंचचे यश असल्याचे सांगितले.

एकलव्याप्रमाणे काम…

अभिनेता सिद्धार्थ जाधव सत्काराला उत्तर देताना म्हणाला की, मनुष्याकडे जे नसते, त्याचा बाऊ न करता जे आहे, त्याकडे लक्ष दिले तर अधिक यश मिळते. या मोहमयी जगात आकर्षक काहीही शाश्वत नसते. तुमचा स्वभाव आणि दुसर्‍यास आदर देणारी वृत्ती हेच तुमचे सौंदर्य असते. आई वडिलांचे आशीर्वाद घेत एकलव्याप्रमाणे सातत्याने काम केल्यास नक्कीच यश मिळते.

नाशिककर असल्याचा अभिमान

अभिनेता चिन्मय उदगीरकर याने आपण नाशिककर असल्याचा अभिमान असल्याचे सांगत कलाकार म्हणून काम करत असताना या शहरासाठी आपण काही तरी देणे लागतो. याकरिता नमामि गोदा उपक्रम राबवत असल्याचे सांगत नाशिकमध्ये चित्रनगरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नाशिककरांनी प्रेम दिले…

गेली 12 वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत असताना आज नाशिककरांनी मला जे प्रेम दिल त्याची ॠणी असून, सुविचार गौरव पुस्काराने जबाबदारी वाढली आहे. मला बळ मिळाल्याचे अभिनेत्री पूजा सावंत हिने सांगितले. यावेळी बोलताना या तिन्ही कलाकारांनी चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास उलगडवून सांगत अनुभव कथन केले.

इतर बातम्याः

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे

Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?