Sindhutai Sapkal Death : सिंधुताई सपकाळ यांचं निधन, महाराष्ट्रावर शोककळा; पंतप्रधान. मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली

| Updated on: Jan 04, 2022 | 11:40 PM

सिंधुताई यांच्या जाण्यानं हजारो त्यांची हजारो लेकरं पोरकी झाली. अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला आदी क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Sindhutai Sapkal Death : सिंधुताई सपकाळ यांचं निधन, महाराष्ट्रावर शोककळा;  पंतप्रधान. मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली
सिंधुताई सपकाळ यांचं निधन
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker), हजारो लेकरांची माय (Mother of Orphans) आणि जवळपास अडीच हजार जावई लाभलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं आज दु:खद निधन झालं. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई यांच्या जाण्यानं हजारो त्यांची हजारो लेकरं पोरकी झाली. अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला आदी क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सिंधुताई समाजसेवेसाठी स्मरणात राहतील- पंतप्रधान मोदी

सिंधुताई सपकाळ या त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नामुळे अनं अनाथ मुलं चांगलं जीवन जगू शकली. त्यांनी उपक्षेत समाजासाठी मोठं काम केलं आहे. त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती, असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.

दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं. इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही. पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरावयाचे आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेला दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली, महिला, निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली.

त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

असंख्य लेकरे पोरकी झाली – राज्यपाल

‘सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो’, अशा शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ही क्षती कधीही भरुन येणारी नाही – फडणवीस

‘वात्सल्यसिंधू, अनाथांची माय अशा अनेक शब्दांनी देश ज्यांना ओळखत होता. भारत सरकारने नुकतंच ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. अशा खऱ्या अर्थानं मातृतुल्य सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानं एक खूप मोठी पोकळी तयार झाली आहे. त्या केवळ अनाथांच्या माय नाही तर अनेक महिलांसाठी त्या प्रेरणा होत्या. अगदी आयुष्य संपवण्यापासून ते अनाथांची माय बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. मला त्यांना अनेकदा भेटण्याची संधी मिळाली. मी मुख्यमंत्री असताना त्या आपल्या प्रकल्पाशी संबंधित अनेक विषय घेऊन यायच्या. त्यांच्या वागण्यातील जे वात्सल्य होतं, त्यामुळे प्रत्येकाला ती आपली आईच वाटायची. त्यामुळे आज खरोखर एक माता आपल्यातून निघून गेली आहे. समाजातील शेवटच्या माणसासाठी काम करणारं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आहे. ही क्षती कधीही भरुन येणारी नाही. दुसऱ्या सिंधुताई होणे नाही. पण आता त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे’, अशा भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

सिंधुताईंच्या अकाली निधन चटका लावणारे- शरद पवार

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्राची मोठी हानी – अजित पवार

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, सिंधुताई सपकाळ यांनी समाजातल्या हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला, त्यांना शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे केले, त्यांना मायेची सावली दिली. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करत, त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आयुष्यभर संघर्ष, कष्ट करत त्यांनी सामाजिक कामाचा वसा जपला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड- अशोक चव्हाण

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना त्यांनी मायेचा आधार दिला. अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई- धनंजय मुंडे

‘बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला…’ असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई!
माईंच्या जाण्याने अनाथ, दीन-दुबळ्यांचे हक्काचे आशा स्थान काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण आदरांजली माई…

माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला- यशोमती ठाकूर

महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

स्वतःला घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत आपल्यासारख्या पिचलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली. माईच्या आश्रमात दीड हजारांहून अधिक मुलांनी मोकळया आभाळाखाली जगण्याचं शिक्षण घेतलं. आश्रमातील अनेक बालकांच्या पंखात बळ भरत माईने त्यांना समाजात मानाचं स्थान प्राप्त करून दिलं अनेक शासकीय उच्च पदस्थ अधिकारी यांपासून उद्योगपती पर्यंत मायेच्या पंखाखाली मुलांनी भरारी घेतली. सिंधुताईंच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय 900 हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तर मानाचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने देऊन त्यांना नुकताच गौरवलं होतं. माईंच्या जाण्यामुळे अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त करून माईंच्या मोठ्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करीत एडवोकेट ठाकूर यांनी त्यांच्या मृत आत्म्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

इतर बातम्या :

Sindhutai Sapkal Death | माई गेली आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला!

Sindhutai Sapkal Death | हजारोंची माय, शेकडो पुरस्कार, पण मातीशी घट्ट नातं! असा होता सिंधूताईंचा खडतर जीवनप्रवास