Nashik| साहित्य संमेलन होणार दणक्यात; पालकमंत्र्यांसह 6 आमदारांनी दिले 55 लाख रुपये

| Updated on: Nov 22, 2021 | 12:41 PM

नाशिक जिल्हा स्थापनेला 150 वर्ष झाली आहेत. या निमित्ताने साहित्य संमेलनात नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास आणि संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

Nashik| साहित्य संमेलन होणार दणक्यात; पालकमंत्र्यांसह 6 आमदारांनी दिले 55 लाख रुपये
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचा लोगो.
Follow us on

नाशिकः नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची एकदम जोरात तयारी सुरू आहे. या संमेलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह 6 आमदार 55 लाख रुपये देणार आहेत. त्यांनी तसे संमतीपत्र दिले आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन विभागाने दिली. त्यामुळे सारस्वतांचा सोहळा एकदम जंगी होणार आहे.

3 डिसेंबरला उद्घाटन

नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर या तारखांना होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या एक दिवस आधी गुरुवारी 02 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता संमेलनस्थळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 4 डिसेंबर रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे.

या आमदारांनी दिला निधी

साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा खर्च मोठा आहे. त्यामुळे आमदारांनी विशेष बाब म्हणून प्रत्येक 10 लाख रुपये द्यावेत, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, सटाण्याचे आमदार डॉ. दिलीप बोरसे यांनी दहा लाखांचा निधी देण्याचे संमतीपत्र जिल्हा नियोजन विभागास दिले आहे. सर्व आमदारांची पत्रे मिळाल्यानंतर एकत्रित प्रस्ताव मंत्रालयातील नियोजन विभागाला देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी दिली.

नाशिकची उमटणार छाप

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांचे वैशिष्ट्यपूर्ण असे कलाप्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. सोबतच कुसुमाग्रजनगरीमध्ये सर्व रसिक नागरिकांच्या माहितीसाठी नाशिकच्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शनही भरवले जाणार आहे. नाशिक जिल्हा स्थापनेला 150 वर्ष झाली आहेत. या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. एकंदर साहित्य संमेलन रसिकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरणार आहे.

इतर बातम्याः

Nashik: डॉक्टर नववधूच्या Virginity Testचा अघोरी प्रकार टळला; पोलिसांचा दट्ट्या ठरला प्रभावी

आरोग्य भरतीमध्ये फेरपरीक्षा, चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या 572 उमेदवारांची यादी जाहीर

बाब्बो, एकट्या जळगावात 3518 कोटींच्या वीजबिल थकबाकीचा डोंगर; महावितरणचे कंबरडे मोडले!