25 लाख अन् प्रॉपर्टीचा वाद, दीराने तिचं अख्खं कुटुंबच संपवलं; तिहेरी हत्येनं महाराष्ट्र हादरला!
सोलापुरात धक्कादायक घटना गडली आहे. पप्पू म्हस्के नावाच्या एका व्यक्तीने आपलीच भवजय आणि पुतण्या, पुतणीचा निर्घृण खून केला आहे. या खुनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

एकीकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यतील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे हे प्रकरण ताजे असतानाच आता दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथे दीरनेच आपली वहिनी आणि पुतण्या, पुतणीचा निर्घृण खून केला आहे. अवघ्या काही सेकंदांमध्ये आरोपीने तीन खून केल्याने संपूर्ण सोलापूर सुन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव शंकर उर्फ पप्पू म्हस्के असे असून तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी तिहेरी हत्याकांड घडले आहे. संपत्तीच्या वादातून दिरानेच भावजय आणि पुतण्या-पुतणीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केली आहे. या घटनेत हत्या झालेल्या महिलेचे नाव गायत्री मस्के असे आहे. या महिलेचा पती सुधाकर मस्के यांचा 5 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून गायत्री मस्के आणि त्यांचा दीर शंकर उर्फ पप्पू मस्के यांच्यात संपत्तीवरून वाद सुरु होते.
हत्या केलेल्या मुलगा, मुलीचा निकाल लागला
याच वादातून शंकर उर्फ पप्पू याने भावजय गायत्री, पुतण्या शिवराज आणि पुतणी प्रिया हिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या कुटुंबाची हत्या झाल्यापासून शंकर उर्फ पप्पू मस्के हा गायब आहे, त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान मृत प्रिया मस्के ही बारवीच्या वर्गात शिकत होती. तीने दिलेल्या परीक्षेचा निकाल लागला असून तिला बारावी सायन्स शाखेतून 68.83 टक्के गुण मिळाले आहेत. आपल्या परीक्षेच्या निकाल पाहण्यापूर्वी प्रिया हिची क्रूर हत्या झाल्याने हळहळ व्यक्त होतेय. तर मृत शिवराज मस्के हादेखील याच वर्षी दहावी CBSE परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याला 61.82 टक्के गुण मिळाले होते.
25 लाख रुपये परत देण्यासाठी तगादा
दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर हत्या करण्यात आलेल्या महिलेचा दीर शंकर उर्फ पप्पू मस्के याच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपत्तीच्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड झाल्याची नातेवाईकांची तक्रार दिली आहे. मृत गायत्री मस्के यांनी संपत्तीतील वाटा तसेच आरोपी शंकर मस्के याला हातउसने दिलेल्या 25 लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. त्यातूनच आरोपीने हे हत्याकांड केल्याचा आरोप केला जातोय. सध्या 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी 3 पथके रवाना केली आहेत.
बीएनएस कलम 103 (अ), 351(2), 3, 5 यासह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.