Manoj Jarange: जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही… मनोज जरांगे यांच्या जहाल वक्तव्याने मोठी खळबळ
Manoj Jarange Patil Big Statement: मराठा आंदोलक मनोज जरांगे हे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने संतप्त आहे. त्यांच्या तिखट प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपूरमध्ये एका सभेत बोलताना जरांगे पाटील असे काही बोलून गेले की त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता वादळ येण्याची शक्यता आहे.

कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील संतप्त आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. बावनकुळे यांच्या आदेशानेच प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात त्यांच्या चार सभा होणार आहे. त्यापूर्वी सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूरमध्ये त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर एका सभेत त्यांनी एक जहाल वक्तव्य केले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
तर जीव घेऊ शकतो
बावनकुळेंच्या एका चुकीमुळे मराठा समाज चिडला आहे. कुणबी प्रमाणपत्रांना हे बोगस म्हणतायत, हे मंत्रीच बोगस आहेत. मराठ्यांमध्ये राज्यात त्यामुळे नाराजीची लाट आहे. बावनकुळेंमुळे फडणवीस अडचणीत आले आहेत. सरकार माझा जीव घेण्याचं प्रयत्न करत आहे, आणि मी देखील जीव देणार आहे. मात्र सूड घेणार, सरकारला सोडणार नाही. मी जर जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही घेऊ शकतो असे जहाल वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात होणार चार जाहीर सभा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला रविवारपासून सुरुवात होत आहे. सांगली जिल्ह्यात त्यांच्या चार ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. सांगलीच्या आटपाडी कवठेमंकाळ, बोरगाव आणि कडेगाव येथे सभा होणार आहेत. जरांगे पाटील आज आटपाडी येथे त्यांचे आगमन होणार आहे. सायंकाळी त्यांची जाहीर सभा आटपाडी मध्ये पार पडणार आहे. तर उद्या सकाळी कवठेमंकाळ तालुक्यात दौरा करून त्यांची सकाळी दहा वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे येथे मराठा समाजाच्या वतीने दुपारी तीन वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आणि कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे जरांगे पाटील यांचे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे
प्रमाणपत्रे रद्द का केलीत?
मुख्यमंत्री फडणवीस यांचे ऐकूनच मंत्री बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र खरे असूनही रद्द करण्याचे काम केले आहे. प्रमाणपत्रे रद्द का केलीत हे फडणवीस आणि शिंदेंनी सांगावे असे जरांगे पाटील म्हणाले. फडणवीसांनी नवे डाव रचले आहेत. रोड बंदोबस्त धाराशिव पासून बंद केला. माझ्यावर हल्ला झाला पाहिजे. दगडफेक झाली पाहिजे. हाणामारी व्हावी असा डाव होता, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. बहुमतामुळे सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. सत्ताधाऱ्यांना माज आला आहे. त्यांचा माज उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कुणबी प्रमाण पत्र रद्द करण्याचे बावनकुळेनी केलेल्या कामाची कल्पना फडणवीसांना असणारच. या सरकारमध्ये एकाही मंत्र्याला स्वत:ची भाकर खायचे देखील अधिकार नाहीत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.