पुढचं आंदोलन ‘वर्षा’वर, थेट पाण्याच्या टाकीवरच… मनोज जरांगेंचा थेट इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला 'वर्षा' निवासस्थानी पाण्याच्या टाकीवर उपोषणाचा इशारा दिला आहे. मराठ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, त्यांनी सर्व मराठ्यांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. सरकार मराठ्यांचे प्रश्न सोडवत नसल्याने हा उठाव आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारच्या भूमिकेवर भाजपनेही उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.

येत्या 29 ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचं नाही. एखाद्यावेळेस मराठे मुंबईला येण्याची दाट शक्यता आहे, असं सूत्र म्हणत आहेत. सूत्रांच्या माध्यमातून तशी बातमी आलेली आहे. बघू काय होतंय पुढे. मुंबईला जाऊन बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत. काही अडचण नाही. शेअर मार्केटचा बैल बघायचा आहे. विमानतळावर जाऊन विमान कसं उडतं ते बघायचं आहे. मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान कसं आहे ते बघायचं राहिलं आहे. मला तर असं वाटतंय वर्षावर बसलेलंच उपोषणाला बसलेलं बरं राहिल. तिथे फडणवीस यांनी पाण्याची टाकी ठेवली आहे. त्यात पाणी कमी पडली तर मी भरतो. उपोषणालाच पाण्याच्या टाकीवर बसतो, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे. सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील हे सोलापूरच्या तांदुळवाडीत आहेत. तांदूळवाडीतील सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांना हा इशारा दिला आहे. कष्ट करण्याची हीच वेळ आहे. मी तुमच्यासाठी आहे. जे व्हायचं ते होऊ द्या. मराठे खावळून उठले आहेत. कारण गोरगरीब मराठ्यांवर अन्याय झाला आहे. मराठ्यांचे अनेक आमदार मंत्री झाले. मात्र कुणीही पत्र दिलं नाही. कधीच अन्नात माती कालण्याचं काम केलं नाही. आम्ही कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही. आम्ही रात्रीपर्यंत संघर्ष केला. पण चंद्रशेखर बावनकुळेंनी अन्नात माती कालवली आहे, असा हल्ला मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
जातीयवाद करत आहेत
जीवाची बाजी लावून झुंज दिली. पण बावनकुळेंनी आमच्या तोंडातला घास हिसकावण्याचं काम केलं. आपण त्यांना चूक सुधारायला सांगितलं. तुम्ही मराठे चांगले आहात. तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. मला समाजावर अभिमान आहे. समाज माझ्यासाठी प्रिय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चूक झाली मान्य करतील अशी आमची अपेक्षा होती. मराठ्यांनीच यांना सत्तेत बसवलं. पण हे मराठ्यांना विसरले आहेत. बावनकुळेंसोबत फडणवीसही जातीयवाद करत आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला.
उठाव करावाच लागणार
ज्याने चूक केली त्याची मुख्यमंत्री पाठराखण करत आहेत. त्यामुळे मराठ्यांना त्रास देणाऱ्यांचा मजा उतरावा लागेल. धनगरांचं यांनी वाटोळं केलं. शेतकऱ्यांची फजिती केली. यांची सत्ता आणण्यासाठी आपण किती दिवस प्रयत्न करणार आहे? बंजारा, आदिवासी समाजाच्या अख्ख्या योजना खाऊन घेतल्या. किती दिवस आपण आंधळे होऊन बघणार आहोत? आता उठाव करावा लागणार आहे, असंही जरांगे म्हणाले.
उत्तर देण्यास तयार – दरेकर
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या वर्षावरील आंदोलनाच्या इशाऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे रोज नवीन इशारे देत असतात. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांना कुणबी प्रमाणपत्र हे शिक्षणासाठी हवं होतं. नोकरीसाठी हवं होतं. राजकारणासाठी त्यांनी कधी मागितलं नाही. वस्तुस्थिती समजून घेऊन फडणवीस यांनी मराठ्यांसाठी सर्वात अधिक योजना आणल्या, असं सांगतानाच जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे. त्यांनी सरकारशी समन्वय साधला तर त्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असं प्रवीण दरेकर म्हणाले.