
मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. अनेकदा उपोषण केलं जातं. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जातं. असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करणार आहेत. येत्या 9 सप्टेंबरपासून हे उपोषण सुरु होणार आहे. सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी या आंदोलनाची रूपरेषा सांगितली.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे. सकल धनगर समाज संघटनेच्या वतीने या आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरु होणार आहे. पंढरपूरमध्ये आमरण उपोषण केलं जाणार आहे. ‘ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष’ असा नारा देत या आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. जेजुरीतील खंडेरायाचं दर्शन घेत या उपोषणाची सुरुवात होणार आहे.
सकल धनगर जमातीच्यावतीने 9 सप्टेंबरपासून पंढरपूरमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहे. सकल धनगर समाज या बॅनरखाली ‘ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष’ असा नारा देत सामुहिक नेतृत्वात हे उपोषण करणार आहे. 1 सप्टेंबर रोजी जेजुरी येथून मल्हारी मार्तंड खंडेराया जेजुरीत भंडारा उधळून पंढरपूरच्या दिशेने धनगर बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने प्राणांतिक उपोषणाची सुरुवात केली जाणार आहे, असं सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी सांगितलं आहे.
राज्यातील सहाही पक्षांनी धनगर आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्व धनगर समाजाचे कार्यकर्ते, नेते आमरण उपोषण करणार आहोत, असं सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी म्हटलं आहे.