अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असतानाच विलिनीकरणाची घाई कोणी केली? तटकरेंचा जोरदार पलटवार

सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे, या भेटीवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे, तसेच विलिनीकरणासंदर्भात देखील त्यांनी मोठं विधान केलं.

अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असतानाच विलिनीकरणाची घाई कोणी केली? तटकरेंचा जोरदार पलटवार
Sunil Tatkare
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 11, 2026 | 6:04 PM

सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला आहे, त्यानंतर त्यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे, तसेच या भेटवर प्रतिक्रिया देत असताना त्यांनी जोरदार पलटवार देखील केला आहे. अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असताना विलिनीकरणाची घाई कोणाला झाली होती, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही, असं यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी म्हटलं की, शपथविधी झाल्यानंतर ही भेट होती. मोदींनी संवेदना व्यक्त केल्या, त्यांनी सुनेत्रा पवार यांना ग्वाही दिली की आम्ही तुमच्यासोबत आहोत. पक्ष, संघटना आणि राज्याच्या व्यापक हितासाठी सोबत आल्याचं त्यांनी सांगितलं.  केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी आहे, असं त्यांनी सांगितल्याची माहिती यावेळी तटकरे यांनी दिली आहे.

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नेमकं काय म्हणाले?

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर बोलताना मोठं विधान केलं होतं. 12 तारखेरला त्या संदर्भात घोषणा होणार होती, असं त्यांनी म्हटलं होतं. आता यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे.

आमच्या भूमिकेचा प्रश्न येतो कुठे? मी आधीपासून विचारलं की राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपवरोबर येणार का? आणि कोण कोणात विलीन होणार? सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय, तसेच त्याच विधीमंडळ पक्षनेत्या असल्या पाहिजेत ही आमच्या पक्षाची भूमिका होती, त्यानुसार आम्ही काम केलं. ते येणार का नाही येणार? या जर तरवर मला भाष्य करायचे नाही. राज्याला प्रगतीपथावर नेण्याची भूमिका दादांची होती,  त्यानुसार आम्ही भाजपसोबत गेलो.  मात्र आम्ही आमची मूळ भूमिका आणि विचारधारा सोडली नाही, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. तसेच  अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असताना विलिनीकरणाची घाई कोणाला झाली होती?  या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही, असा पलटवारही यावेळी तटकरे यांनी केला आहे.