उपोषणाशिवाय…, जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलल्या

आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे, या आंदोलनावर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

उपोषणाशिवाय..., जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलल्या
मराठा आरक्षण आंदोलनावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 10:01 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आंतरवाली सराटीमध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पंधरा दिवसांचा वेळ दिला आहे. जर येत्या पंधरा दिवसांमध्ये आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 12 सप्टेंबरला आम्ही मराठा समाजाची बैठक बोलावू आणि त्यामध्ये मुंबईमधील आंदोलनाची घोषणा करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे.  इथे प्रत्येक गोष्टीसाठी उपोषण करावं लागत आहे.  आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी उपोष, पेपरफुटीसाठी उपोषण, जरांगे पाटील देखील उपोषण करत आहेत,  उपोषण केल्याशिवाय सरकार ऐकतच नाही, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा आधून -मधून सुरू असते,  यावर देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी एकत्रच आहे. आमचा पक्ष एकत्रच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच पक्ष आहे. पक्षाचा फाउंडर मेंबर कोण आहे?
पक्षाचा फाउंडर प्रेसिडेंट कोण आहे? तर शरद पवार आहेत. चुकीच्या पद्धतीने तो पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. जर तुम्ही पक्षाचं संविधान पाहिलं तर  शरद पवार यांच्यावर अन्याय झाल्याचं दिसून येईल, असा हल्लाबोल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हा देश कोणाच्या मन मर्जीने चालत नाही. तो संविधाने चालतो. पक्षाचं काय करायचं? पक्ष कोणाला द्यायचा? पक्षाचं नेतृत्व कोण करेल हे ठरवण्याचे सर्व अधिकार शरद पवार यांचे आहेत. चुकीच्या पद्धतीने संविधानाची चिरफाड सुरू आहे.  जो अन्याय शरद पवारांवर झाला परत दुसऱ्या कोणावर होऊ नये. कोणाची सत्ता परमनंट नसते, असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Follow Us