अशोकराव, भाजपमध्ये येण्याची तुमची काय मजबुरी होती?; भाजपच्या नेत्याचा सवाल

Suryakanta Patil on Ashok Chavan : भाजपच्या महिला नेत्याने अशोक चव्हाण यांना थेट सवाल केलाय. त्यांनी लोकसभा निवडणूक आणि नांदेडमधील निकालावरही भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं? शरद पवार यांच्याबाबत सूर्यकांता पाटील काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

अशोकराव, भाजपमध्ये येण्याची तुमची काय मजबुरी होती?; भाजपच्या नेत्याचा सवाल
नरेंद्र मोदी, अशोक चव्हाण
Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 08, 2024 | 5:48 PM

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नांदेड जिल्हा आणि परिसरातील राजकीय समिकरणं बदलली. अशोक चव्हाणांच्या पक्षांतरावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. अशोकरावांनी काँग्रेस सोडणे ही माझ्यासाठी आश्चर्याची घटना होती. अशोकरावांची भाजप येण्याची काय मजबुरी होती. मला कळलं नाही. मी त्यांना म्हटलं सुद्धा खूप आश्चर्य आहे. अशोकराव तुमचं स्वागत करू की खेद व्यक्त करू…भाजपात येऊन अशोकरावांचे वैयक्तिक खूप मोठे नुकसान झालं. केंद्रात मंत्रीपद देण्यासाठी अशोकराव लायक आहेत, हा निर्णय मोदी – शाह घेतील, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.

नांदेडच्या पराभवावर काय म्हणाल्या?

नांदेडमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. तर काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला. यावर सूर्यकांता पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. नांदेड लोकसभेत भाजपाचा पराभव ही दुर्दैवी गोष्ट आहे. अशोकराव भाजपात आल्याने आम्ही निर्धास्त होतो. काय घडलं आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही पण पराभव जिव्हारी लागला. अशोक चव्हाण भाजप आल्याने फायदा झाला की तोटा झाला याचा निर्णय अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी घ्यावा. अशोक चव्हाण यांची मी विरोधक असले तरी शत्रू नाही. अशोकराव चव्हाण यांना मी दोष देणार नाही, असंही सूर्यकांता पाटील म्हणाल्या. नांदेडमधील राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

मोदींच्या शपथविधीवर प्रतिक्रिया

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. उद्या संध्याकाळी हा शपथविधी सोहळा होणार आहे. यावर सूर्यकांता पाटील यांनी भाष्य केलंय. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. मला निमंत्रण आहे. पण जाता आलं नाही. उत्तम प्रकारचे काम ते करतील, असं त्या म्हणाल्या.

तिकीट वाटपात चुकीची रणनीती झाली. हिंगोलीची सीट हेमंत पाटलाला मी सोडली होती. नियमाप्रमाणे ती मला मिळाला पाहिजे होती. वाशिम-यवतमाळमध्ये पाच वेळेस निवडून आलेल्या भावना गवळीला त्यांनी बाजूला केलं. चुकीच्या निर्णयामुळे हिंगोली, यवतमाळची सीट गेली. चुका कशामुळे घडल्या याचा अभ्यास करावा लागेल. चुकीमुळे आमच्या हिंगोली, यवतमाळच्या जागा गेल्या अशा पुष्कळ जागा गेल्या असतील, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.