ठाणे : ठाणे महानगर पालिकेने (Thane Mahanagar palika) कोलांट उडी मारलीय. काल (सोमवार) लॉकडाऊनचं नोटिफिकेशन काढल्यानंतर आज महापालिका (मंगळवार) पुन्हा नव्याने पत्रक काढणार आहे. ज्या हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा केली तिथे आता तूर्तास निर्बंध नसणार आहेत. (Thane Mahapalika U tern Firstly lockdown notification After Circular Will Be issued)
हॉटस्पॉट झोनमध्ये अंशत: लॉकडाऊन देखील नसेल. जे नियम सर्वत्र लागू आहेत तेच नियम हॉटस्पॉट मध्ये देखील असतील. मिशन बिगीन अगेन हॉटस्पॉट झोनमध्ये देखील लागू असणार आहे. एकंदरित कोणतेही नवीन निर्बंध नसतील.
ठाणे महापालिकेने अचानक लॉकडाउनचा निर्णय घेतल्याने लोकांमध्ये घबराट आणि गोंधळ पाहायला मिळाला होता. यानंतर राज्य सरकारकडून पालिका प्रशासनाला सद्यस्थितीची विचारणा झाली. यामध्ये रुग्णांचं प्रमाण तसंच हॉटस्पॉट झोनची संख्या तसंच आरोग्य यंत्रणा, अशा विषयांवर विचारणा झाली. साहजिक त्यामुळे महापालिकेवर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढावली.
ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ठाण्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. अशाच प्रमाणात रुग्णांचा संसर्ग वाढत गेला तर आगामी काळात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही.
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट (प्रतिबंधित क्षेत्र ) निश्चित केली आहेत. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी या 16 हॉटस्पॉटमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल, असा निर्णय ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला होता. मात्र आता या निर्णयावरुन आता महापालिकेने यू-टर्न घेतला आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. काल (8 मार्च) 8 हजार 744 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रविवारी 7 मार्चला 11 हजार 141 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील अनेक इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा दिला आहे. दररोज वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता आवश्यक असल्यास सरकार अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतं, असे अस्लम शेख म्हणाले.
(Thane Mahapalika U tern Firstly lockdown notification After Circular Will Be issued)
हे ही वाचा :
Maharashtra Lockdown | ठाण्यातील हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन लागू; मुंबईही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?
Mumbai Lockdown news | तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा
महाराष्ट्रातील तीन शहरं लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, तुमच्या शहरातील कोरोना स्थिती काय?