सरकारमधील मित्रपक्ष ठाण्यात बनले शत्रूपक्ष? सेना-राष्ट्रवादी आमनेसामने, वाद चिघळणार?

| Updated on: Jun 17, 2022 | 2:41 PM

Thane Municipality Politics : प्रभाग रचना करण्यात आली असताना, काही विशिष्ट भागाचा विचार केला जातेय आणि कळवा मुंब्रात संख्या कमी करून शहारतले प्रभाग वाढवण्यात येणार होते ,असा आरोप आव्हाड यांनी केला होता.

सरकारमधील मित्रपक्ष ठाण्यात बनले शत्रूपक्ष? सेना-राष्ट्रवादी आमनेसामने, वाद चिघळणार?
आनंद परांजपे आणि नरेश म्हस्के आपआपल्या पत्रकार परिषदेत बोलताना
Follow us on

ठाणे : ठाणे महापालिकेतील राजकारण (Thane Politics) तापू लागलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारमधील मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभाग रचनेवरुन दोन्हीही पक्ष आमनेसामने आल्यानं वाद सुरु झाला आहे. वादग्रस्त प्रभाग रचनेच्या विरोधात शिवसेना न्यायालयात दाद मागणार आहे, असं ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. तर शिवसेनेचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे काय करत होते? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष आनंद परांजपे यांनी म्हटलंय. हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकीकडे राज्य सरकारमध्ये एकत्र असणारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ठाण्यात मात्र शत्रूपक्ष बनत असल्याची चर्चा रंगली आहे. ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहे..तसतशी प्रभाग रचनेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने आली आहे. राज्यात महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena & Congress) सत्तेत एकत्र सहभागी आहे. ठाण्यात मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेक वेळा खडाजंगी दिसून आली आहे. त्याचा भाग म्हणून ठाणे पालिकेच्या जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

आव्हाडांच्या राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न?

याच प्रभाग रचनेवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी माझी राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. प्रभाग रचना करण्यात आली असताना, काही विशिष्ट भागाचा विचार केला जातेय आणि कळवा मुंब्रात संख्या कमी करून शहारतले प्रभाग वाढवण्यात येणार होते ,असा आरोप आव्हाड यांनी केला होता. दरम्यान राजकीय हत्येचा बनाव करून प्रभाग रचनेत हेराफेरी केल्याचा गंभीर आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केला. एकीकडे प्रभाग रचनेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर येत असताना प्रभाग रचना होण्याआधी शिवसेनेचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाने कश्यासाठी गेले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.

आरोप-प्रत्यारोप

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड माझा एकीकडे राजकीय खून झाला असल्याचा आरोप केला असताना दुसरीकडे मात्र आव्हाड यांनी सोयीनुसार प्रभाग केल्याचं मस्के यांनी म्हटलंय. मुंब्रातील सर्व प्रभाग सरासरी लोकसंख्येपेक्षा कमीचे करणाऱ्या निवडणूक आयोगाने दिव्यातील प्रभाग सरासरीपेक्षा मोठे करून दिवावासीयांवर अन्याय केला आहे. हक्काचे 9 नगरसेवक त्यांना द्यावे, ही मागणी मान्य झाली नाही तर प्रभाग रचनेच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटलंय.

तर लोकसंख्या ठरवण्याचा अधिकार हा जनगणना आयुक्तांकडे असून 2011च्या जनगणनेने नुसार प्रभागरचना झाल्या आहेत. यंदाच्या पालिका निवडणुकीत देखील त्याच पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली असून या प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचं आनंद पराजपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. दरम्यान प्रभाग रचनेत काहीही फेरफार झाली असल्यास म्हस्के यांनी पोलिसांत तक्रार करावी असे खुले आवाहन देखील परांजपे यांनी केलंय. तसेच प्रभाग रचना होण्याआधी शिवसेनेचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाने कशासाठी गेले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.

संबंधित बातम्या :

राजकारणातले सिनिअर अजितदादा ज्युनिअर ठाकरे यांच्यात काय चर्चा? महापालिका निवडणुकीतही “एकाच गाडीत”?

आमदार निलंबन रद्द ठरवल्यावरून रामराजे निंबाळकरांचं राष्ट्रपतींना साकडं, म्हणाले हे तर विधिमंडळाचे अधिकार…

फडणवीस म्हणतात भाजपाची वाटचाल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराने, तर चंद्रकांत पाटील म्हणतात…