…तर डोंबिवलीकर विचारही करू शकत नाही असा अनर्थ घडला असता; अख्खी रात्र गेली, अखेर 7 तासानंतर आग विझली

| Updated on: Mar 09, 2023 | 9:32 AM

आग नियंत्रणात आणण्यासाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, ठाणे, भिवंडी परिसरातील अनेक अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या जवानांनीही आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं.

...तर डोंबिवलीकर विचारही करू शकत नाही असा अनर्थ घडला असता; अख्खी रात्र गेली, अखेर 7 तासानंतर आग विझली
Fire in Dombivli
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रमेश शर्मा, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली : डोंबिवली येथील एमआयडीसीमध्ये लागलेली भीषण आग अखेर 7 तासानंतर नियंत्रणात आली आहे. ही आग अत्यंत भीषण होती. आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी एमआयडीसीतील दोन कंपन्या संपूर्ण जळून खाक झाल्या असून त्याजागेवर केवळ कोळसाच उरला आहे. या एमआयडीसीच्या बाजूला सीएनजी पेट्रोल पंप होता. या पेट्रोल पंपापर्यंत आग पोहोचू नये म्हणून अग्निशमन दलाचे जवान विशेष प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले. जर ही आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असं सूत्रांनी सांगितलं.

मध्यरात्री एकच्या दरम्यान डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली. सुरुवातीला एकाच कंपनीला आग लागली. एका परफ्यूम बनविणाऱ्या कंपनीला ही आग लागली. रात्रीची वेळ आणि थंडगार वाऱ्यामुळे ही आग अधिकच भडकली आणि वाऱ्यासारखी पसरली. या आगीमुळे परफ्यूम कंपनी तर जळून खाक झालीच. शिवाय बाजूची राम सन्स टेक्स्टाईल ही कपड्यांची कंपनीही जळून खाक झाली. टेक्स्टाईल कंपनीतील कपड्यांनी प्रचंड पेट घेतला. त्यामुळे आग विझता विझता विझेना. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण आग काही नियंत्रणात येत नव्हती.

हे सुद्धा वाचा

पाच ठिकाणाहून गाड्या आल्या

आग नियंत्रणात आणण्यासाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, ठाणे, भिवंडी परिसरातील अनेक अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या जवानांनीही आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं. मात्र कपड्याची कंपनी आणि परफ्यूमची कंपनी असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी असमर्थ ठरले. याच कंपन्यांच्या बाजूला सीएनजी पेट्रोल पंप असल्याने मोठा स्फोट होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.

त्यामुळे ही आग पेट्रोल पंपापर्यंत येऊ नये म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागलत होती. एकीकडे आग विझवण्याचं आव्हान आणि दुसरीकडे पेट्रोल पंपापर्यंत आग पोहोचू नये यासाठीचा प्रयत्न अशी अग्निशमन दल जवानांना अख्खी रात्रभर तारेवरची कसरत करावी लागली.

होत्याचं नव्हतं झालं

अग्निशमन दलाच्या जवानांनी सात तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. सध्या या ठिकाणी कुलिंगचे ऑपरेशन सुरू आहे. या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचारी संध्याकाळी कंपनी बंद करून घरी निघून गेल्याने सुदैवाने कंपनीत कोणी नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या आगीत प्राज टेक्सटाइल आणि रॅमसन्स या दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.

सर्वत्र धूर, कोळसा या व्यतिरिक्त काहीही दिसत नाहीये. कपड्याच्या कंपनीत तर सर्वाधिक कोळसा दिसत आहे. संपूर्ण कपडे जळून राख झाले आहेत. होत्याचं नव्हतं झालं आहे. त्यामुळे या दोन्ही कंपनी मालकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समोर आलं नाही. आगीचं कारण शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.