कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी, उल्हास नदीला पूर, बदलापुरात पूरस्थिती; ठाणे जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण

| Updated on: Jul 19, 2021 | 4:06 PM

कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही संपूर्ण ठाणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची दाणादाण उडाली आहे. (Heavy rains in thane district)

कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी, उल्हास नदीला पूर, बदलापुरात पूरस्थिती; ठाणे जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण
Heavy rains in thane district
Follow us on

ठाणे: कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही संपूर्ण ठाणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची दाणादाण उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी झाल्याने वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तर उल्हास नदीला पूर आला आहे. बदलापूरमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अॅलर्ट झालं आहे. (Heavy rains in thane district, water-logging in Thane, Kalyan, Dombivali and Ulhasnagar)

कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी

कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 177 मिली मीटर पाऊस पडला आहे. ही अतिवृष्टी आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही झोपडपट्टी परिसरातही पाणी साचले आहे. नागरिकांची इतरत्र राहण्याची व्यवस्था केली जात आहे. रात्री नऊ वाजता 2.5 मीटरची भरती येणार आहे. त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी लोलाईन एरियातील नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

वालधूनीचं पाणी घरात

अतिवृष्टीमुळे कल्याणच्या वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील वालधूनी, अशोकनगर, शिवाजी नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे या परिसरातील शेकडो लोकांना इतरत्रं हलविण्यात आलं आहे.

डोंबिवलीत हिरवा नाला

डोंबिवलीत एका केमिकल कंपनीने नाल्यात केमिकल सोडल्याने नाल्याचा प्रवाह हिरवा गार झाला होता. त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, पालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी या कंपनी विरोधात मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. एमआयडीसीकडून रायबो कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आहे. प्रदूषण मंडळाने कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

कल्याणी येथे रस्ता खचला

कल्याण-डोंबिवलीत सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा-कल्याण या मुख्य रस्त्यावर कल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आजूबाजूच्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते आणि या पाण्यामुळे हा रस्ता खचल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.

काळू नदीवरील पूल पाण्याखाली

टिटवाळ्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील काळू नदीवरील रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे, अशी माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली आहे.

अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात नदीला पूर

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधूनी नदीला आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर या नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय. वालधुनी नदी अंबरनाथ जवळच्या तावलीच्या डोंगरात उगम पावते. कालपासून डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक धबधबे प्रवाहीत झाले असून या नदीत पाण्याचा मोठा प्रवाह आला आहे. ही नदी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहत असून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या अगदी बाजूनेच वालधुनी नदी वाहते. या नदीला आलेल्या मोठ्या प्रवाहामुळे काही काळासाठी शिवमंदिरात जाणारे पूल सुद्धा पाण्याखाली गेले होते. सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. त्यामुळे नदीचा प्रवाह सुद्धा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून त्यामुळे वालधूनी नदीला पूर आला आहे.

कळव्यात कमरेएवढं पाणी

कळवा येथे काल दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कळवा येथील न्यू शिवाजी नगर या परिसरात कमरे एवढं पाणी साचलं आहे. या शिवाजी रोड शेजारील भला मोठा नाला ओसंडून वाहू लागल्याने परिसरात कमरे एवढे पाणी साचले आहे. या कमरे इतक्या पाण्यात काही तरुण मस्ती करताना पहायला मिळत आहे. तर लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि दुकानदार त्रस्त झाले आहेत.

मुंब्र्यात प्लॅन सिटीत कमरेएवढे पाणी

ठाण्यातील मुंब्र्याजवळ एमएमआरडीए आणि एमएसआरडीएकडून सुरू असलेल्या प्लॅन सिटीमध्ये कमरे एवढं पाणी साचलं आहे. या प्लॅनसिटीचा आराखडा शहर विकास खात्याकडून तयार केला जात आहे. परंतु या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. या प्लॅनसिटीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठेही क्रॉसिंग कलवर्ट नाही. जर हे कलवर्ट थेट खाडीत सोडले तर अशी परिस्थिती ओढवणार नाही.

या भागात पाणी साचल्यानंतर ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण यांनी विभागाची पाहणी केली. यावेळी मुंब्रा कौसा हे जुने शहर आहेत त्यामुळे अशा स्थितीमध्ये पाणी भरणं समजू शकतो. परंतु महापालिका आणि एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या प्रोजेक्ट प्लॅनमध्ये पाणी साचणे ही शहर विकास खात्याची चूक आहे. करोडो रुपये खर्च करून नियोजन नाही. लोकांच्या जीवाकडे कानाडोळा करून ही प्लॅनसिटी तयार केली जात असल्याचा आरोप पठाण यांनी केला. तसेच या ठिकाणी एमएमआरडीए, एमएसआरडीए आणि शहर विकास खात्याने संयुक्त सर्वे केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मानपाड्यात भिंत कोसळली

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील मानपाडा मुल्ला भागात कॉसमॉस इमातीची संरक्षण भिंत कोसळून 5 चार चाकी आणि 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. सध्या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान मदत कार्यकरत आहे. या दुर्घनटेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तर,ठाणे महापालिका मुख्यालयाजवळच रस्त्यावर प्रचंड पाणी साचले आहे. मुख्यालयासमोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांना वाट काढणे कठीण जात होतं. ठाण्यात सकाळी एका तासात 42 मिली मीटर पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे तलावपाळी परिसर जलमय झाला होता. तलाव पूर्ण भरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी आले आहे.

मुंब्रा-पनवेल हायवे बंद

मुंब्रा, शिळफाटा व पारसिक डोंगररांग येथे मुसळधार पाऊस झाल्याने मुंब्रा-पनवेल हायवेवर पाण्याचा प्रवाह आला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुंब्रा शिळफाटा परिसरातील तसंच या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहन ठाणे पोलिसांनी केलं आहे. (Heavy rains in thane district, water-logging in Thane, Kalyan, Dombivali and Ulhasnagar)

 

संबंधित बातम्या:

नेहमीची मर्सिडीज नाही, आदित्य ठाकरेंची रेंज रोव्हर दिमतीला, तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने

Mumbai Rains Live Updates | मुंब्रा शीळ फाटा ते पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद

Mumbai Rain : कुठे भिंत तर कुठे दरड कोसळली, गेल्या 24 तासांत मुंबईत 33 जणांचा मृत्यू

(Heavy rains in thane district, water-logging in Thane, Kalyan, Dombivali and Ulhasnagar)