जमिनीसाठी शेतकरी कुटुंबावर हल्ला, शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर आरोप, मनसे आमदाराचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

| Updated on: Feb 04, 2022 | 6:14 PM

कल्याण ग्रामीणमध्ये (kalyan) जबरदस्तीने जमीन लाटण्यासाठी एका शेतकरी कुटुंबीयांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेच्या (shivsena) माजी नगरसेवकाने ही बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.

जमिनीसाठी शेतकरी कुटुंबावर हल्ला, शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर आरोप, मनसे आमदाराचा पोलीस ठाण्यातच ठिय्या
जमिनीसाठी शेतकरी कुटुंबावर शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा हल्ला, गुन्हा दाखल नाही
Follow us on

कल्याण: कल्याण ग्रामीणमध्ये (kalyan) जबरदस्तीने जमीन लाटण्यासाठी एका शेतकरी कुटुंबीयांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेच्या (shivsena) माजी नगरसेवकाने ही बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. ही घटना घडल्यानंतर 20 तास उलटून गेले तरी पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गेल्या दोन तासांपासून थेट पोलीस अधिकाऱ्याच्या दालनात ठाण मांडून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत जागेवरून हटणार नाही, असा पवित्राच मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतल्याने पोलिसांचीही धावपळ सुरू झाली आहे. तसेच पाटील यांच्या ठिय्या आंदोलनाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने पोलीस ठाण्याबाहेर मनसे (mns) कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली असून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी मनसे कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.

कल्याण ग्रामीणमधील मोकाशी पाडा दहीसर मोरी या तीन गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांची 285 एकर शेती आहे. या शेतीवर विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत. या महत्वाच्या जागेवर सर्व बिल्डरांचा डोळा आहे. काल गुरुवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास काही जण हातात लाठ्याकाठ्या घेऊन तीन चार गाड्या भरुन आले आणि मोकाशी पाड्यातील एकनाथ मोकाशी आणि त्यांचा मुलगा प्रशांत मोकाशी यांना बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे मोकाशी कुटुंब घाबरून गेले असून भयभीत झाले आहेत.

व्हिडीओ व्हायरल

केडीएमसीचे मात्तबर माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. हल्लेखोरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे मनसेच आमदार राजू पाटील यांनी शेतकरी कुटुंबांना भेटण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याने संतप्त आमदार राजू पाटील हे डायघर पोलिस स्टेशनला पोहचले. डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन गावडे यांची तब्य्येत अचानक बिघडल्याने पोलिस स्टेशनमध्ये अन्य अधिकाऱ्यांशी राजू पाटील यांनी चर्चा केली. गेल्या तीन तासांपासून पाटील हे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गावडे यांच्या दालनात जखमी शेतकऱ्यांना घेऊन बसले आहेत. मात्र, तरीही गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलीस ठाण्यातून हलणार नाही

शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. जे कोणी गुन्हेगार आहेत. त्यांना शिक्षा पाहिजे. शेतकऱ्यांवरील अन्याय कदापि खपवून घेणार नाही, अशा शब्दात राजू पाटील यांनी पोलिसांना सुनावले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय इथून हालणार नाही, असा पवित्रा घेत पाटील यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तर, पाटील हे पोलीस ठाण्यात तीन तासांपासून असल्याची वार्ता पसरल्याने मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर गर्दी होताना दिसत आहे.

 

संबंधित बातम्या:

जगात भारी कल्याणकर: कासम शेख यांना आयटीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरचा MVP पुरस्कार; महाराष्ट्रातून शेख एकमेव

Thane Megablock : मेगाब्लॉक दरम्यान ठामपाच्या परिवहन सेवेकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन

Thane : ठाणे महापालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम; अनधिकृत बॅनर, होर्डिंगवरही कारवाई