ठाकरे सरकार सत्तेचा दुरुपयोग करतंय, थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांचा हल्लाबोल; नितेश राणेंची केली पाठराखण

| Updated on: Dec 27, 2021 | 6:49 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे सरकार सत्तेचा दुरुपयोग करतंय, थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांचा हल्लाबोल; नितेश राणेंची केली पाठराखण
union minister kapil patil
Follow us on

कल्याण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. आघाडी सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप करतानाच कपिल पाटील यांनी नितेश राणे यांची पाठराखणही केली आहे.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज सायंकाळी शहाड रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यातील आघाडी सरकार अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करत असेल तर ते चूकीचं आहे. एखाद्या माणसाचा संबंध असेल तर कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. कायदा कुणाला चूकत नाही. मात्र परिस्थिती निर्माण करुन भाजपचा नेता आहे म्हणून कोणाला अडकविणे हे चूकीचे आहे. आपल्या हाती सत्ता आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन परिस्थीती निर्माण करणे चूकीचे आहे, असं पाटील म्हणाले.

पूलासाठी पावणे तीन कोटी खर्च

शहाड रेल्वे स्थानकात कसाऱ्याच्या दिशेने प्रवासी रेल्वे मार्ग ओलांडून स्टेशन गाठत होते. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. हे अपघात रोखले जावेत म्हणून हा पादचारी पूल तयार करण्यात आला आहे. 2 कोटी 75 लाख रुपये खर्च करुन हा पादचारी पूल तयार करण्यात आला आहे. या लोकार्पण सोहळ्यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे उपस्थित होते.

भाजप नगरसेवक, कार्यकर्ते स्वाभिमानी

दरम्यान, शिवसेनेच्या कॅलेंडरवर भाजपच्या माजी नगरसेवकाचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय माहोळ उठलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपचा नगरसेवक असो की कार्यकर्ता तो स्वाभिमानीच असतो. कोणी कुठेही जाणार नाही. कोणच्याही बॅनर फोटो असणे म्हणजे तो त्या पक्षाचा आहे असे होत नाही. भाजपचा कोणताही नगरसेवक शिवसेनेत जाणार नाही. अनेक ऑफर भाजपच्या नगरसेवकांना दिल्या जातात. हे सगळयांनाच माहिती आहे. पण आमचे लोक स्वाभिमानी आहेत ते कुठेच जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

श्रेयापेक्षा कामं करण्यासाठी पुढाकार घ्या

इतकेच नाही शिवसेना मनसेत रस्त्याच्या कामावरुन सुरु असलेल्या वादावर कपिल पाटील यांनी भाष्य केलं. कल्याण-डोंबिवलीत श्रेयवाद नेहमी होत राहिला आहे. श्रेय वादापेक्षा लोकांना अपेक्षित असलेली विकास कामे करण्याकरीता पुढाकार घेतला पाहिजे. लोकांना ते जास्त आवडेल. कल्याण-डोंबिवलीत ज्या नागरी सुविधा असायला हव्या होत्या. त्या यापूर्वी झालेल्याच नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 

संबंधित बातम्या:

विधानपरिषदेत सदस्यांची निवृत्ती, फोटो काढताना दोन भाई गैरहजर; रामदास कदम यांच्या गैरहजेरीची चर्चा तर होणारच

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका, नाना पटोलेंची टीका, राज्यपाल भाजपची बी टीम?

अमरावती, नांदेडमधील दंगलीवर विधानसभेत खडाजंगी; फडणवीस म्हणाले, हा ‘प्रयोग’ होता