राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची किल्ल्याहून तीन लेकरांसह उडी, कुटुंबियांचा थरकाप उडवणारा दावा..

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी घेतलेल्या निर्णयानंतर मोठी खळबळ उडाली. आपल्या 3 मुलांसह त्यांनी थेट किल्ल्याहून उडी घेतली. अश्विनी पौळ यांच्या या निर्णयानंतर माहेरच्या लोकांनी गंभीर आरोप केली आहेत.

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची किल्ल्याहून तीन लेकरांसह उडी, कुटुंबियांचा थरकाप उडवणारा दावा..
Wrestler Ashwini Mohite Paul
| Updated on: Sep 04, 2026 | 10:39 AM

श्रीराम क्षीरसागर धाराशिव : राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी घेतलेल्या निर्णयानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून त्यांनी उडी घेतली. कौटुंबिक छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या लोकांनी केला. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात गुरुवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ वय 30 यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्याच्या उंच बुरुजावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत अश्विनी पौळ त्यांचा साडेपाच वर्षीय मुलगा अजिंक्य आणि जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पौळ या महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून मुलांसह माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. घटनेनंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती व सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असून संबंधित सर्व बाबींचा तपास केला जात आहे.

अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कुस्तीपटू म्हणून ओळखल्या जात होत्या. कुस्तीची आवड आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले होते. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य कुस्ती क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांना लहानपणापासूनच कुस्तीचे संस्कार लाभले होते.

त्यांनी विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके जिंकत महाराष्ट्राचे नाव उंचावले होते. कुस्ती क्षेत्रात त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना “महाराष्ट्राची वाघीण” अशी ओळख मिळाली होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुस्ती क्षेत्रासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्रकरणाचा सर्वांगीण तपास सुरू आहे. माहेरच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राष्ट्रीय स्तरावरील एक गुणी खेळाडू आणि तीन निरागस बालकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us