मुंबई – शिंदे-भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर, यंदाचे दहीहंडी (Dahi handi), गणेशोत्सव (Ganeshotsav)हे उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरु झाली आहे. दोन वर्षांपासून कोरोना असल्याने या सगळ्याच उत्सवांवर निर्बंध आले होते. यामुळे यावेळी होणारे हे दोन्ही सण निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. गणेशोत्सवातील गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध असणार नाहीत, मंडपांच्या नोंदणी शुल्कात कपात अशा घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणवासियांसाठीही विशेष सुविधा केल्या जाणार आहेत. कोकणात गणेशोत्सवसासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात. त्यांना य़ोग्य सुविधा मिळाव्यात अशा प्रमुख तीन घोषणा करण्यात आल्या आहेत. नियम पाळून आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा, अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली
गणेशोत्सवाच्या आधीपासून कोकणवासिय मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. मुंबई – गोवा महामार्गाचे काम गेले अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे अशा स्थितीत दरवर्षी हा रस्ता चांगले नसल्याची ओरड करण्यात येत असते. यावेळी मात्र या रस्त्याचे काम युद्धगतीने सुरु असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, यावेळी कोकणात जाणारे रस्ते चांगले असतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
दरवर्षी प्रमाणे मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गे आणि कोकणात टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना टोलमाफीचा निर्णय घेण्यात येतो आहे. यावेळी आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्यांसाठीही टोलमाफीच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती.
गणेशोत्सवासाठी यावर्षीही कोकणात जास्त बसेस पाठवल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांनाही बैठकीत निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या सगळ्या घोषणांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हिंदू कार्ड खेळण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येते आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत दहीहंडीवरील आलेले थरांचे निर्बंध, गणेशमूर्तींच्या उंचीवरील आलेले निर्बंध, मूर्तीकार आणि गमेशोत्सव मंडळांच्या मागण्या याबाबत ठोस निर्णय होताना दिसत नव्हते. यासाठी सातत्याने भाजपाकडून आशिष शेलार गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन पाठपुरावा करत होते. आता हे निर्णय घेत सार्वजनिक मंडळे, दहिहंडी मंडळे त्यांचे कार्यकर्ते यांना खूश करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात येतो आहे, अशी चर्चा आहे.