टिपू सुलतानचा वाद, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची कोंडी, हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीची वडिलांसाठी भावुक पोस्ट

सध्या राज्यात टिपू सुलतानवरून चांगलाच वाद पेटला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीपू सुलतानबाबत बोलताना मोठं विधान केलं होतं, त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

टिपू सुलतानचा वाद, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची कोंडी, हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीची वडिलांसाठी भावुक पोस्ट
harshwardhan sapkal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 16, 2026 | 6:55 PM

मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता, यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं. हिंदूत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या, दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं.   ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात भाजप चांगलंच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. अनेक ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन देखील करण्यात आले. पुण्यात भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये जोरदार राडा देखील झाला.

दरम्यान त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांची मुलगी गार्गी सपकाळ यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली आहे. गार्गी सपकाळ या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कन्या आहेत, त्या लंडन स्थित एका महाविद्यालयात पब्लिक हेल्थवर शिक्षण घेत आहेत. सोबतच दवा आणि दुवा प्रकल्प देखील राबवीत आहेत. गार्गी सपकाळ यांनी आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ एक भावनिक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. ” सत्य ओळखा आणि सत्याच्या बाजूने एकजुटीने उभे राहा, खऱ्या स्वराज्यासाठी एकत्र लढा.. ”  असं आव्हान गार्गी सपकाळ यांनी आपल्या या पोस्टमधून केलं आहे.  सध्या गार्गी सपकाळ यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

नेमकं काय म्हणाल्या गार्गी सपकाळ? 

” सत्य ओळखा आणि सत्याच्या बाजूने एकजुटीने उभे राहा, खऱ्या स्वराज्यासाठी एकत्र लढा.. ” असं आव्हान गार्गी सपकाळ यांनी केलं आहे. पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, खरतर माझ्या वडिलांचं विधान अगदी स्पष्ट आणि संदर्भासहीत होतं. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे, टिपू सुलतानने महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन काम केलं. शिवरायांच्या विचाराप्रमाणेच टिपू सुलतानने कोणत्याही विखारी विचारांना पाठिंबा दिला नाही, असा त्यांच्या विधानाचा हेतू होता असं गार्गी सपकाळ यांनी म्हटलं आहे.