केंद्राकडून राज्याला वाढीव निधी… एकूण 15 विधेयके मांडली जाणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत CM फडणवीसांची माहिती

Maharashtra Budget Session : उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाब माहिती दिली आहे.

केंद्राकडून राज्याला वाढीव निधी... एकूण 15 विधेयके मांडली जाणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत CM फडणवीसांची माहिती
CM F
Image Credit source: X
| Updated on: Feb 22, 2026 | 8:31 PM

उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. तत्पूर्वी आज सत्ताधारी पक्षांची पत्रकार परिषद पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अर्थसंकल्पाबाबत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अधिवेशनात 15 विधेयके मांडली जाणार आहेत अशी माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमंक काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अजित दादांनी अर्थसंकल्पासाठी मोठी मेहनत घेतली होती…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे. अजित दादांनी अर्थसंकल्पासाठी मोठी मेहनत घेतली होती, मात्र ते आज नाहीत. एखादी योजना शक्य नसल्यास ते स्पष्टपणे सांगायचे. अजित पवार कधीही बेशिस्त कारभार चालू देत नव्हते, त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन आम्ही नक्कीच करू.

महाराष्ट्राच्या निधीत 20 हजार कोटींची वाढ

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राच्या माध्यमातून राज्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. महाराष्ट्राच्या निधीत 20 हजार कोटींची वाढ झाली आहे. आता राज्याला 98 हजार 306 कोटी रूपये निधी मिळणार आहे. आम्ही जी मागणी केली होती, ती मान्य होत आहे. रेल्वेच्या बजेटसाठी 23 हजार कोटी रूपये मिळाले आहेत. युपीएने 10 वर्षांत राज्यातील रेल्वेला 12 हजार कोटी दिले, आता एका वर्षासाठी 23 हजार कोटी रूपये मिळाले आहेत.

कृषी क्षेत्रात एआयचा वापर

एआय फॉर एग्रीकल्चरवर सरकारचा भर असणार आहे. अजित दादांनी 500 कोटी रुपयांचं एआय मिशन सुरु केलं होतं. यासाठी महा विस्तार अॅप तयार केलं आहे. यात हवामान, पीक पद्धती, बाजारभाव याची माहिती मिळते. राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांकडून याचा वापर सुरू आहे. बहुभाषिक अॅप आहे, यात भिली भाषेतही प्रश्न विचारल्यास उत्तर मिळते. यामुळे कृषी क्षेत्रात राज्य खूप पुढे जाणार आहे. शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात एआयचा वापर करत आहोत, यामुळे 25 ते 40 टक्क्यांपर्यंत उत्पादन खर्च कमी झाला.

अधिवेशनात 15 विधेयके मांडली जाणार

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अधिवेशनात एकूण 15 विधेयके मांडली जाणार आहेत. चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न करू. दोन प्रलंबित विधेयक असणार आहेत. चर्चा करून आम्ही ही विधेयके मंजूर करू. अजित दादांच्या सूचना लक्षात घेऊ. आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत यात विकास, कर्ज, दायित्व यांचा मेळ बसवावा लागतो. आम्ही कोणतीही योजना बंद करणार नाही.