
मराठवाड्यातील काही भागात रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा कहर केला. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, बीडमधील पाटोदा, शिरूर, जालना शहर यांसह बहुतांश भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली. तर राज्यात सध्या काही भागात हलक्या ते मध्यम सरी, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
निफाड तालुक्यातील लासलगाव येथे 50 मिलिमिटर तर खडक माळेगाव, टाकळी विंचूर, कोटमगावसह परिसरात 80 मिमी पाऊस झाला आहे. शेतामध्ये पाणी तुंबल्याने शेतीला ताळ्यांचे स्वरूप आले आहे. द्राक्ष, मका, सोयाबीन, टोमॅटो पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बीडच्या पिंपळगाव कानडा गावात सिंदफना नदीचा पूर आल्याने बारा लोक एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत. tv9 मराठीच्या बातमीनंतर 12 लोक पुराच्या पाण्यात अडकलेल्या पिंपळगाव कानडा च्या दिशेने प्रशासकीय यंत्रणेसह आमदार विजयसिंह पंडित रवाना झाले आहेत. एनडीआरएफची एक तुकडी या लोकांना बाहेर काढणार आहे.
सीना नदीच्या पुराच्या पाण्याने करमाळा तालुक्यातील संगोबा येथील आदिनाथ महाराजांच्या मंदिराला विळखा घातला आहे. यात 90 भाविक अडकले आहेत. यात नागरिकांबरोबर महसूल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, शेतकऱ्यांचे पंचनामे युद्धपातळीवर केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मीही धाराशिवला जाणार, इतर मंत्रीही पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. पावसामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभाग सतर्क आहे. जीवनावश्यक वस्तू विविध ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत, यात पीठ, कपडे, भांडी, औषधे, साड्या यांचा समावेश आहे.
करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिरात अडकलेल्या 90 जणांचे रेस्क्यू करण्यासाठी आलेली बोट रस्त्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बोट अडकली आहे.
शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा रोखण्याचा प्रकार केला आहे. जनावर मेली आहेत तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो, मी पैसे घेऊन आलेलो नाही असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेवर कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी मनसेने आज महामोर्चा काढला होता. मनसे कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष अभिनंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला होता. भाईंदर महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
जालना तालुक्यातल्या दुधना काळेगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा खरीप पिकासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. दुधना काळेगावमधील शेतकरी प्रकाश भांदर्गे यांचा दोन ते तीन एकरवरील उसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
अमरावतीत सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे. सरकारमधील एकही मंत्री शेती बांधावर नसल्याची टीकाही त्यांनी केली.
पीक नुकसानीसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून जीआर जाहीर करण्यात आला आहे. शेत पीक नुकसानीसाठी राज्यातील 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “तुम्ही सरन्यायाधीश, उपराष्ट्रपती आणि निवडणूक आयुक्त बदलू शकता, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकत नाही? संपूर्ण प्रकरण काय आहे हे कोणालाही माहिती नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेस-एससीपीचे प्रमुख शरद पवार म्हणाले, “राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून ते स्वतः संसदेत एक संस्था आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. पण आज जे घडत आहे ते म्हणजे निवडणूक आयोगाऐवजी मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी पक्षांसह भाजप नेते आयोगाच्या वतीने उत्तरे देत आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की निवडणूक आयोगावर निर्माण व्हायला हवा तो विश्वास कमी होत आहे.”
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात शेतीचं नुकसान झालं आहे. जनावरंही दगावली आहेत. तसेच घरांची पडझड झाली आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांचा धाराशिव दौरा करणार आहेत. मराठवाड्यातील स्थिती पाहता उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. केंद्राने तातडीने दहा हजार कोटींची मदत द्यावी असं त्यांनी सांगितलं आहे.
बीडच्या नांदूर हवेली गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 36 जणांची सुखरूप सुटका काढण्यात आली आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आणखी काही लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
आदिवासी समाजाचा नांदेडच्या किनवट मध्ये भव्य मोर्चा काढला आहे. आदिवासी समाज आरक्षण बचाव मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर दाखल झाला आहे. ST प्रवर्गामध्ये कोणालाही आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
चंद्रपूरमध्ये माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले आहेत. बच्चू कडू यांनी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे ठिय्या मांडला. प्रचंड उकाडा आणि उन्हात आंदोलकांचा दीड तासांपासून चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ठिय्या मांडला. आंदोलनामुळे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरची वाहतूक दीड तासापासून पूर्णपणे ठप्प झाली होती.बच्चू कडू यांनी मागण्या मान्य होत पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा दिला इशारा दिला आहे.
सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. याबद्दल फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मंत्रिमंडळात पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच पंचनामे करण्याचं काम अद्यापही सुरुच आहे. शेकऱ्यांना तातडीची मदत करण्याचं काम सुरु आहे.”
सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मॉर्फ करून साडीमध्ये दाखवल्याने भाजप कार्यकर्ते संतापले. डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात साडी नेसवली.
धनगर समाज्याला ST प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी धनगर सामाज्याचे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी सहित पाच गावांचा मध्यरात्रीपासून संपर्क तुटला आहे. गोदावरीचा बॅकवॉटरमुळे ओढ्याला पाणी आल्याने ग्रामस्थ करत आहेत थर्माकोलच्या होळग्याने जीवघेणा प्रवास
नाशिकमधील गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या मांडीपर्यंत पाणी आले आहे. नाशिकमध्ये आज देखील येलो अलर्ट जाहिर करण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सवना परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून पैनगंगा नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर वरील पिकांचे दरवेळी नुकसान होते .. त्यामुळे पैनगंगा नदीवर असलेले येळगाव येथील धरणाचे स्वयंचलित गेट पावसाळ्यात नेहमीसाठी उघडे ठेवावे, अन्यथा ते कायमवरूपी बंद करावे, जेणेकरून नदीला पूर येऊन नुकसान होणार नाही. मात्र प्रशासन ऐकत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून नुकसान भरपाई तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन करत आहे.
राज्यात पावसाने मोठा तडाखा दिला. 70 लाख एकरवरील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी कल्याण दुर्गाडी किल्लायवर जाऊन दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दुर्गाडी किल्ल्यावर 24 तास भक्तांची अलोट गर्दी असून येत्या नऊ दिवसात मोठमोठे राजकीय नेते देखील यादी कधी दर्शनासाठी येतात.
मंत्री गिरीश महाजन यांनी बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली परिसरात पूरस्थितीचा आढावा घेतला. ट्रॅक्टर मधून प्रवास करत मंत्री गिरीश महाजन यांनी नांदूर हवेली गाव आणि परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. पूराचे पाणी वाढत असल्याने नांदूर हवेली गावातील नागरिकांना हलवण्यासंदर्भात आणि सतर्कता बाळगण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.
काल सांगली मध्ये झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने संस्कृती बचाओ मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर एकतर्फी भाषण करण्यात आले. याच्यातून राष्ट्रवादीचा विकृत प्रदर्शन मेळावा होता की काय आमच्या देवा भाऊ वर काहीजणांनी एकेरी शब्द वापरले व अरे तुरे पण शब्द वापरले,अशी टीका भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.
भूम तालुक्यातील बेदरवाडी येथील शेतकरी उमेश वनवे यांचा संसार पावसाने उध्वस्त केला आहे. नदीच्या कडेला असलेल्या असलेल्या गोठ्यातून वनवे यांच्या दोन पुराच्या पाण्यात बुडुन मृत्यु पावल्या तर एक गाय व एक बैल वाहून गेला. दोन एकर शेती असलेल्या वनवे कुटुंबाचा उदरनिर्वाह हा दुधाच्या व्यवसायावरती अवलंबून होता मात्र या गाई दगावल्यामुळे वनवे कुटुंब उघड्यावर आले आहे. आलेल्या पुराच्या पाण्यात दोन वस्त्र तरंगून जिवंत राहिली आता तीच वासरं मेलेल्या गाईला बघून मोठ मोठ्याने हंबरडा फोडत आहेत
राज्यस्तरीय चिंतन शिबिरानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य ? राष्ट्रवादी नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी दिला राजीनामा. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
जळगावच्या पाचोरा तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा बसल्याचं पहायला मिळालं.
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील लासगाव सह इतर गावातील शेतांमध्ये तब्बल गुडघाभर पाणी साचलं आहे. लासगाव या गावात केळीच्या शेतामध्ये तब्बल गुडघाभर पाणी साचल असून शेतातील पूर्ण केळी पाण्याखाली गेली आहे.
अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ नुकसान झालंय, अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नव्हती – शरद पवार
निफाड तालुक्यातील खडक माळेगावसह अनेक गावात पहाटे मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेतातील पाणी शिव रस्त्यावरून वाहत असतांना शेताकडे या पूर पाण्यातून शेतकरी ट्रॅक्टर वरून मार्ग काढत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला आहे. यामुळे, नदीकाठी असलेल्या प्रसिद्ध संगोबा मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला असून, मंदिरात सुमारे ९० नागरिक अडकले आहेत. करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार हजेरी लावलेल्या या पावसामुळे नगर-कल्याण महामार्ग गेल्या दोन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात २४ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे पुढील काही दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
कळव्यातील नाट्यगृहाचा मार्ग आता मोकळा झाला असून, राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील शासन निर्णयही नुकताच जारी करण्यात आला आहे. हे अद्ययावत नाट्यगृह कळवा-खारेगाव परिसरातील १२,७०० चौरस मीटर आरक्षित भूखंडावर उभे राहणार आहे.
बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावात सध्या पूरस्थिती गंभीर बनली आहे. गावातील आणि आसपासच्या परिसरातील अनेक घरे पुराच्या पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्याचेही दिसून येत आहे. गावातील जिल्हा परिषदेची शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचेही नुकसान होत आहे. या पुरामुळे जनावरांचा चारा वाहून गेला आहे, तर अनेक गुरे पुरात अडकलेली आहेत. यामुळे ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे.
नाशिकच्या सिटी सेंटर मॉलजवळ महिला बाऊन्सर्सनी भररस्त्यात एका टेम्पो चालकाला शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता नागरिक या महिलांवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तीन ते चार महिला बाऊन्सर्स टेम्पो अडवून चालकाशी वाद घालताना दिसत आहेत. किरकोळ वादातून सुरु झालेल्या या प्रकारात महिला बाऊन्सर्सनी टेम्पो चालकाला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्याला मारहाण करण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत.
पुणे- रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून महापालिकेने एक लाख 13 हजार रुपये दंडाची वसुली केली. 277 नागरिकांवर महापालिकेकडून रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून गेल्या 22 महिन्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
परळी गोदावरी नदीपात्रात पाणी वाढल्यामुळे पोहनेर ते पाथरी रस्ता बंद करण्यात आला आहे. परळी तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पोहनेर पाथरी मार्ग बंद करण्यात आला. जायकवाडी धरणाचे आपत्कालीन नऊ दरवाजे उघडल्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
पुणे – माजी खासदार कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीगीर महासंघाचं पुण्यात आज निषेध आंदोलन आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये सर्व संलग्न संस्थांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आंदोलन आहे. ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आंदोलन आहे. आंदोलनात कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे आमरण उपोषण करणार आहेत.
नाशिकमध्ये रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातदेखील संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक 6 हजार क्यूसेस सुरू पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर गंगापूर, दारणा, भावली सह इतरही काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मुंबईच्या भाजप पक्ष कार्यालय परिसरात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडकर हे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश असल्याने बॅनरबाजी करण्यात आली. भाजप आणि वैभव खेडकर यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली. आज दुपारी तीन वाजता भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉईंट पक्ष कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. भूम परंडा या भूम तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. ग्रामीण भागातील नदी नाल्यांना मोठा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
बीड- माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली इथं पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या गरोदर महिलेला NDRF च्या पथकाने सुखरूप बाहेर काढलं. गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या घरामध्ये एक गरोदर महिला अडकून पडली होती. तिला काही वेळापूर्वीच NDRF च्या पथकाने सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं आहे. बीड जिल्ह्यात सध्या गोदावरी, सिंदफणा आणि मांजरा या तीनही नद्यांना पूर आल्याची स्थिती आहे.