
जळगावजवळ पुष्पक एक्स्प्रेस गाडीला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी घाबरून घाईघाईने लगतच्या रुळांवर उड्या मारण्यास सुरुवात केली. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या गाडीने त्यांना धडक दिली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. टोरेस घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारलं. तातडीने कारवाई करण्याच्या कर्तव्यात मुंबई पोलिसांनी कसूर केली, तत्परता दाखवली नाही, पोलिसांनी जागरूक राहणं आवश्यक असल्याचं कोर्टानं यावेळी म्हटलं. मस्साजोग येथील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या जामीनावर आज केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात निर्णय होणर आहे. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट 48 वी वार्षिक सर्व साधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम आज होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेने हटवल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. सोलापुरातील सात रस्ता परिसरात हा सर्व प्रकार पाहायला मिळाला. नो डिजिटल झोनमध्ये भाजप कार्यकर्त्यानी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. मात्र सात रस्ता चौक परिसर हा नो डिजिटल झोन आहे, शिवाय कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेने कारवाई करत हे बॅनर हटवले. यावेळी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची पाहायली मिळाली.
पुण्यातील स्वारगेटमधून बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. एहसान हाफीज शेख असं या बांगलादेशी घुसखोराचं नाव आहे. एहसान शेखकडून 15 आधार आणि 8 पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 30 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. स्मारकासाठी 3 महिन्यांचा वेळ वाढवून दिला आहे. स्मारकाचं काम व्यवस्थित सुरू आहे, असे प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आहे. कुठल्याही पैशांची निधीची कमी पडू देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचं स्मारक होईल, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
देवयानी फरांदे या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार मागे होता. त्या ऋणनिर्देशासाठी राज ठाकरे यांची देवयानी फरांदे भेट घेणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील 41 हजार धान उत्पादक शेतकऱ्यांचे 292 कोटी 64 लक्ष रुपयांचे चुकारे थकले असल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
कोल्हापूरमधील गारगोटी मधील शासकीय विश्रामगृहाच्या जमीन विक्री प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गारगोटी मधील शासकीय विश्रामगृहाची जागा खाजगी व्यावसायिकाच्या नावावर झाल्याचं समोर आलं आहे. जागा खरेदी केलेल्या व्यवसायिकाने इमारत खाली करण्यासंदर्भात नोटीसही दिली आहे. शासकीय रामगृहाची संबंधित जागा खाजगी मालकाची असल्याचं समोर आलं आहे. मात्र वर्षानुवर्ष शासकीय विश्रामगृह असून देखील ती जागा नावावर करून घेण्याबाबत संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याची माहितीही समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींना पाचोरा येथून जळगावकडे हलवण्याचे काम सुरू आहे. पाचोरा येथे दहा जखमी प्रवासी उपचार घेत आहेत. प्रशासनाच्या वतीने रुग्णवाहिकेचे नियोजन करून रुग्णांना हलवण्याचे काम सुरू आहे. पाचोरा येथील खाजगी रुग्णालयातून जळगाव भुसावळ येथे या जखमी प्रवाशांना हलवण्याचं काम सुरु आहे.
पुण्यातील खराडी परिसरामध्ये पतीने पत्नीची हत्या करून त्याचा व्हिडिओही काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रॉपर्टी हडप करण्याच्या उद्देशाने पत्नीची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. धक्कादाय म्हणजे खून करून पती पोलीस ठाण्यात हजर राहिला. दरम्यान पतीविरोधात खराडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव- पुष्पक रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी, नातेवाईकांच्या ताब्यात मृत्यूदेह देण्यासाठी प्रशासनाकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात प्रशासनाकडून आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
चेक बाऊन्सप्रकरणी मुंबईतील एका न्यायालयाने बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या सात वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर मंगळवारी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने हा निर्णय दिला.
छोटा राजनचा हस्तक डी. के. रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याच्या आरोपात अटक करण्यात आली. अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली.
टोरेस प्रकरणात ईडीने कारवाई सुरू केली आहे. टोरेस प्रकरणात ईडीकडून जवळपास दहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे. मागील अर्ध्या तासापासून शरद पवार आणि अजित पवारा यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे.
पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले आहेत. मात्र मंचावरील शरद पवार आणि अजित पवारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली. आधी शरद पवार आणि अजित पवारांची खुर्जी शेजारीशेजारी होती. नंतर अजित पवारांच्या शेजारी जयंत पाटील बसले. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बाळासाहेब देशमुखांची खुर्ची ठेवण्यात आली.
नालासोपा-यातील अनाधिकृत इमारतीवर तोडक कारवाईला सुरवात झाली आहे. कारवाई सुरू होताच रहिवाशी महिलांनी हंबरडा फोडला. धाय मोकलून रडणा-या या महिला मागच्या 18 वर्षांपासून येथे राहत होत्या.
बाळासाहेब ठाकरे यांचा भाजप आणि शिंदे गटाला जो पुळका आला आहे, हे हिंदुत्वाचे आणि प्रेमाचे ढोंग आले आहे, ते बंद करा, असे संजय राऊतांनी फटकारले. बाळासाहेब ठाकरे यांना भाररत्न द्या अशी मागणी राऊतांनी केली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी ठाकरे गटाने भाजपला डिवचले. कलानगर जंक्शन मातोश्री आणि माहीम परिसरामध्ये ठाकरे गटाने भाजपला डिवचणारे बॅनर लावले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला.
जळगाव पडधाडे पुष्पक रेल्वे अपघातात मृत्युमुखी आणि जखमींचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालय परिसरात मोठी गर्दी दिसत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नेपाळमधील नागरीक आहेत
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी दिलेल्या जाहिरातीवरून धाराशिव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. जाहिरातीमध्ये धनुष्यबान हे शिवसेनेचे चिन्ह गायब असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान असल्याचे दिसून येत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत दोन शिवसेनेचे मेळावे होत आहे. एक अंधेरीत तर दुसरा बीकेसी मध्ये मेळावा होत आहे. बीकेसीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे. मोठं असं व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे.
छत्तीसगड, महाराष्ट्र तेलंगण सीमावर्ती भागात माओवाद्यांनी तयार केले होते मोठे ट्रेनिंग सेंटर. ट्रेनिंग सेंटर कोबरा पोलिसांनी केले उद्धवस्त. बिजापूर जिल्ह्यातील भट्टीगुडा जंगल परिसरात हे ट्रेनिंग सेंटर तयार करण्यात आला होते. दीड वर्षापासून 300 माओवादी येथे प्रशिक्षण घेत होते. या ट्रेनिंग सेंटरमध्ये काही पक्की घरे आणि काही कच्चा झोपड्या तयार करण्यात आल्या होत्या. माओवाद्यांच्या मोठा शहीद सप्ताह याच ट्रेनिंग सेंटर मध्ये संपन्न झाला होता. या ट्रेनिंग सेंटरमध्ये बंदूक तयार करणे, बॉम्ब तयार करणे, घातक हल्ले करणे असे प्रशिक्षण दिले जात होते.
गारगोटीमध्ये भर वस्तीत असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेची विक्री. खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला थांगपत्ताच नाही. खाजगी मालकाने विकली आणि महसूल विभागाने ही तत्परतेने सातबारा करून दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालकी अधिकारांत नाव. मात्र खरेदी करताना कोणतीच नोटीस नाही. बांधकाम व्यवसायिक सयाजी देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागा खाली करण्यासंदर्भात पाठवली नोटीस.
आरोपीने सैफवर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या चाकूचे दोन तुकडे पोलिसांनी जप्त केले असून तिसऱ्या तुकड्याचा सध्या शोध सुरू आहे. त्यासाठी वांद्रे तलाव परिसरात पोलिसांनी शोध मोहिम राबवली. एक तुकडा तलावात टाकला असल्याचे हल्लेखोराने तपासादरम्यान सांगितले.
जळगावच्या परधाडे जवळ झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेमध्ये आणखी एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली असून आतापर्यंत एकूण 3 जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. शिवकुमार चव्हाण असं बेपत्ता असलेल्या तरुणाचं नाव आहे. शिवकुमार हा मुंबईला राहतो, त्याचा मंडप टेन्टचा व्यवसाय आहे. तो त्याच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी केला होता. गावावरून पुष्पक एक्सप्रेसने परतत असताना अपघाताची घटना घडली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार असून त्याच्यासाठी प्रसिध्दी पत्रक जारी करण्यात आलं आहे. आरोपीचा पत्ता सांगणाऱ्यास जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्याकडून बक्षीस जाहीर. आरोपीचा पत्ता सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
9 तारखेपासून कृष्णा आंधळे फरार असून त्याच्या शोधासाठीच बीड पोलिसांनी काढले प्रसिध्दी पत्रक.
जळगाव जवळ झालेल्या रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू, 10 जणांची ओळख आत्तापर्यंत पटली आहे. निव्वळ अफवेमुळे हा दुर्दैवी अपघात घडला आहे – अजित पवार
कोंढव्यात 22 लाख रुपयांचा अफू जप्त. राजस्थान येथून अफू विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा भागात पकडले. त्याच्याकडून 21 लाख 80 हजार रुपयांची 1 किलो 90 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. नथुराम जीवनराम जाट असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांच्यानंतर आता कलाकार कपिल शर्मालाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
कपिल शर्मा, त्याचे कुटुंबीय, सहकारी, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात आंबोली पोलिसांनी बी एन एस कलम ३५१ (३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जळगावजवळ पुष्पक एक्स्प्रेस गाडीला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी घाबरून घाईघाईने शेजारच्या रुळांवर उड्या मारण्यास सुरुवात केली. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या गाडीने त्यांना धडक दिली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. यातील सात मृतांची ओळख पटली असून त्यामध्ये 4 जण नेपाळचे तर तिघे हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.