शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच सरकारची प्राथमिकता : उद्धव ठाकरे

| Updated on: Mar 02, 2021 | 8:32 PM

शेतकरी बांधवांना शेतीसाठी दिवसा आणि पुरेशी वीज देण्यालाच शासनाची प्राथमिकता आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय.

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच सरकारची प्राथमिकता : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : शेतकरी बांधवांना शेतीसाठी दिवसा आणि पुरेशी वीज देण्यालाच शासनाची प्राथमिकता आहे. त्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. ते महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचं उद्घाटन करताना विधानभवनात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते (Uddhav Thackeray assure Farmers about Electricity in day time).

इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत

उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्व देश, राज्य टाळेबंदीत (लॉकडाऊन) होते तरी शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे घरुनच (वर्क फ्रॉम होम) केली जात होती. शेतकऱ्यांनी लॉकडाऊन केले असते तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कटुंबियांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील.

जगाचे कामाचे तास सूर्यप्रकाशात असतात आणि शेतकऱ्यांचे मात्र रात्रीचे कशासाठी?

“जगाचे कामाचे तास सूर्यप्रकाशात असतात, मग शेतकऱ्यांचे मात्र रात्रीचे कशासाठी? ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संकटांचा मुकाबला करत तो जगासाठी सोनं पिकवत असतो. त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे क्षण कसे येतील हे पाहणे सरकारचे काम आहे. ‘घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ’ असे आम्ही होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाची ताकद मोठी असते. ती जेवढी जास्त मिळेल तेवढा काम करण्याचा हुरुप वाढतो. त्या जोरावर आम्ही शेतकऱ्यांसाठी जे जे करणे शक्य आहे ते निश्चितच करू,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला आमचं प्राधान्य असून नुकतेच नीती आयोगासोबत झालेल्या बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

वीजबिलांची थकबाकी भरुन योजनेचा लाभ घ्यावा : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “वीजग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीजबील थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जोडणी धोरण अंतर्गत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच शेतकरी, घरगुती वीज ग्राहक आदी सर्वांनाच व्यवस्थित वीज मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी वीजबिले भरणे आवश्यक आहे. वीजगळती होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.”

5 वर्षात 5 लाख सौर कृषी पंप देण्याचे शासनाचे उद्दिष्ट

“आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असून शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषीपंपांचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. सर्वांना व्यवस्थित वीज मिळेल. वेळेत वीजेची जोडणी मिळेल हे आमचे उद्दिष्ट आहे. 5 वर्षात 5 लाख सौर कृषी पंप देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या अनुषंगाने सौर कृषी पंप योजनेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.

“पडिक जमीनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन प्रतीएकरी दरवर्षी 30 हजार रुपये भाडे आणि त्यावर दरवर्षी 3 टक्के वाढ असा फायदा मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा,” असंही उपमुख्यमंत्री म्हणाले.

सुमारे 18 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, “नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणांतर्गत 19 फेब्रुवारीपर्यंत 10 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्टापेक्षा अधिक काम करत सुमारे 18 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच 10 हजाराहून अधिक सौर कृषीपंप देण्यात आले आहेत. कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण अंतर्गत 84 वाहिन्यांना लघु सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवली जात असून त्याद्वारे 30 हजाराहून अधिक शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे.”

या बैठकीत कृषी ऊर्जा पर्व बाबतचे संगणकीय सादरीकरण महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. आतापर्यंत सुमारे 4 लाख शेतकऱ्यांनी कृषी वीज बिलांची एकूण 364 कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे. या थकबाकीच्या अनुषंगाने 668 कोटी रुपयांची थकबाकी माफ झाली आहे, असे सिंघल यांनी सांगितले.

हेही वाचा :

घोषणांचा पाऊस अन् अंमलबजावणीचा दुष्काळ… असं होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

VIDEO: सात टर्मचा खासदार, मुंबईत आत्महत्या, भाजपच्या नेत्यांकडून छळ, त्याचीही चौकशी, ठाकरेंकडून मोठी घोषणा

VIDEO: दादा प्रेसमध्ये थोडेच बोलले, बोलले ते थेटच, हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणून दाखवा

व्हिडीओ पाहा :

Uddhav Thackeray assure Farmers about Electricity in day time