कॉक्रोच जनता पार्टीचं भविष्य काय? उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दात सांगितलं, म्हणाले, देशात राज्य…
कॉक्रोच जनता पार्टीच्या भविष्याबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. तसेच शिवसेनेच्या राजकीय दिशेविषयी देखील माहिती दिली.

कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाने दिल्ली हादरवली. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात 36 दिवस चाललेल्या आंदोलनाने मोदी सरकारला मोठा धक्का दिला. दीपके यांच्या आंदोलनाला देशासहित विविध राज्यातील राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रातून ठाकरे बंधूंनीही अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी शिवाजी पार्कवर जाहीर सभा देखील होती. ठाकरे यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर जाऊन देखील जंतर-मंतरवरील आंदोलकांशी संवाद साधला होता. मोदी सरकारला 12 वर्षांच्या कारकिर्दीत पहिला मोठा धक्का देणाऱ्या कॉक्रोच जनता पक्षाच्या भविष्यावर मोठं भाष्य केलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या भविष्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, ही एक आंदोलनाची ठिणगी आहे. त्यामुळे तुम्ही लगेच समजू नका, कॉक्रोच जनता पार्टी निवडणूक लढवेल. खरंतर शेवटी ती मुलं आहेत. सर्व मुले उद्वेगानं रस्त्यावर उतरली आहेत. त्यांना सरन्यायाधीशांनी कॉक्रोच म्हटल्याचा भयंकर राग आला. त्यांचा राग व्यक्त होत आहे. ते देशात राज्य करतील, हा फार पुढचा विषय आहे. त्यांना ठरवू द्या. आता सर्वांना त्यांच्यासोबत राहणे गरजेचं आहे. अन्यथा सत्तेतला चिकटलेल्या आणि लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या ज्या गोचिडी बसल्या होत्या. त्या सगळं रक्त शोषून घेतील. मग आपल्याला कोणी वाचवू शकणार नाहीत’.
क्रॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांचे पालक देखील आंदोलनात होते. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘आंदोलकांचे पालक देखील होते. काही मुलांनी परीक्षेच्या टेन्शनने आत्महत्या केल्या होत्या. तुम्ही त्यांच्या भावनेची त्यांच्या त्रासाची कदर करणार आहात की नाही? एवढं शिकल्यानंतर त्यांच्या कपाळी बेकाराची सोटाच येत असेल, त्यांचं भविष्य काय? परीक्षा केंद्रात जाऊ इच्छिणारी ही मुले रस्त्यावर उतरली आहेत? याचा कोण विचार करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेच्या राजकारणाची पुढील दिशा काय?
शिवसेनेच्या राजकारणावर बोलताना म्हटलं की, ज्या दिशेने आहे, त्या दिशेने न थकता, न थांबता वाटचाल करणे. शिवसेना पक्षाच्या कार्यक्रमाविषयी ठाकरेंनी सांगितले. ‘ आम्ही तरुणांच्या मागे नेहमीच उभा राहत आलोय. जसजसे विषय येतील, तसतसं योग्य-अयोग्य करत त्यांच्या सोबत राहणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशभरातील दौऱ्याविषयी ते म्हणाले, ‘मला जिथं जिथं जाणं आवश्यक वाटेल, तिथं मी जाणार आहे. लोकांना भेटणार. मग तो दौरा शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, रामरक्षेसाठी असेल. मी जाणार आहे’.
