Bhaskar Jadhav : नार्वेकर कोण लागून गेला, षण्मुखानंद हॉलच्या आवारात काल काय घडलं? भास्कर जाधव इतके का संतापले?
Bhaskar Jadhav : सध्या उद्धव ठाकरे गटात एक अस्वस्थतता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन वर्षात सहा खासदार फुटले. काल षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 60 वा वर्धापन दिन सोहळ्यात एक घटना घडली. ती खूप बोलकी आहे. शिवसेनेतील सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यातून बरेच काही अंदाज बांधता येऊ शकतात.

षण्मुखानंद हॉलमध्ये काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय बोलतात? शिवसैनिकांना काय आदेश देतात? याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. कालच्या कार्यक्रमासाठी षण्मुखानंद हॉल खच्चून भरला होता. ठाकरे गटाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी,नेते झाडून हजर होते. यावेळी षण्मुखानंद हॉलच्या आवारात एक घटना घडली. ती खूप बोलकी आहे. ठाकरे गटातील नेत्यांच्या परस्परांबद्दल काय भावना आहेत, ठाकरे गट फुटल्यानंतर शिवसैनिकांमधला नेत्यांचा वावर कसा आहे, या बद्दल ही छोटीशी घटना बरच काही सांगून जाणारी आहे.
काल षण्मुखानंद हॉलमध्ये वेगवेगळ्या वृत्त वाहिन्यांचे पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते. पक्षात एवढी मोठी फूट पडल्यानंतर हे पत्रकार ठाकरे गटातील नेत्यांशी बोलून त्यांचे विचार, भावना जाणून घेत होते. यावेळी एक महिला पत्रकार भास्कर जाधव यांच्याशी षण्मुखानंद हॉलच्या आवारात संवाद साधत होती. ही महिला पत्रकार भास्कर जाधव यांच्याशी बोलत असताना मागून एका कारचा आवाज आला. त्यावर तिने सांगितलं की, नार्वेकर आहेत. यावर भास्कर जाधव ‘नार्वेकर कोण लागून गेला’, असं पटकन बोलून गेले.
भास्कर जाधव यांची अशी प्रतिक्रिया उमटण स्वाभाविक
ही महिला पत्रकार भास्कर जाधव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच मागून गाडीचा सतत हॉर्न वाजवला जात होता. व्हिडिओ पाहताना खरचं तो हॉर्नचा आवाज कानाना त्रास देणारा, चीड आणणार वाटला. त्यामुळे भास्कर जाधव यांची अशी प्रतिक्रिया उमटण स्वाभाविक आहे. भास्कर जाधव या महिला पत्रकाराला बाईट देताना बोलत होते की, “ऑपरेशन तुडवा बरोबर आहे, चुकीच काही नाहीय. आता जनतेने उठाव करण्याची गरज आहे. आज तुम्ही उद्धव साहेबांबद्दल अनेक तक्रारी सांगता, ममता बॅनर्जींबद्दल काय तक्रार होती?”
ही पद्धत बरोबर नाही
भास्कर जाधव हे बोलत असताना गाडीच्या हॉर्नचा आवाज काही थांबत नव्हता, त्यावर चिडलेल्या भास्कर जाधव यांनी रागाने कारकडे पाहून विचारलं हॉर्न काय आहे?. “हे बघा पक्ष फुटल्यानंतर, ही पद्धत बरोबर नाही. अजिबात बरोबर नाही. आमचे जरी कोणी नेते असले म्हणून काय झालं” असं भास्कर जाधव स्पष्टपणे बोलून गेले.